
पुणे, 06 मार्च, (हिं.स.)। साथ रोगांवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पुण्यात मेट्रोपॉलिटन सर्व्हेलन्स युनिट (एमएसयू) उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी जागा ही निश्चित करण्यात आली होती. पण भाजपच्याच नगरसेवकांनी स्थायी समितीमध्ये उपसूचना देऊन जागा बदलण्याचा निर्णय घेतला आणि या प्रकल्पालाच खो घातला आहे. त्यामुळे भाजपच्या अंतर्गत राजकारणामुळे तब्बल आठ कोटी रुपयांचा निधी परत जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. केंद्राच्या प्रकल्पाल अडथळा होत असताना यास भाजपच्या एकाही नगरसेवकाने हरकत घेतली नाही.
मेट्रोपॉलिटन सर्व्हेलन्स युनिटसाठी राज्यातील मुंबई, नागपूर आणि पुणे या तीन शहरांची निवड झाली आहे. हा नियंत्रण कक्ष शहराच्या मध्यभागी असले पाहिजे यासाठी कुंभारवाडा येथील कै. तुकाराम हरिभाऊ जावळे भवन येथे जागा निश्चित केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेच्या बैठका घेतल्या होत्या. सध्या या कक्षासाठी १६ कर्मचारी काम करत असून, तेथे आठ कोटी रुपयांची कामे करून पुढील सहा महिन्यात हे युनिट पूर्ण क्षमतेने चालविले जाणार होते. त्यासाठी खर्चाची निविदा आज स्थायी समितीच्या बैठकीत मान्यतेसाठी आलेली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु