इंधन टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये; कोल्हापूर जिल्हा प्रशासनाचे आवाहन
कोल्हापूर, 06 मार्च (हिं.स.)। सध्या आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या तणावपूर्ण पार्श्वभूमीवर जिल्ह्यात इंधन तुटवडा निर्माण झाल्याची अफवा काही ठिकाणी पसरत आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर वाहनांमध्ये अतिरिक्त
इंधन टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये; कोल्हापूर जिल्हा प्रशासनाचे आवाहन


कोल्हापूर, 06 मार्च (हिं.स.)। सध्या आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या तणावपूर्ण पार्श्वभूमीवर जिल्ह्यात इंधन तुटवडा निर्माण झाल्याची अफवा काही ठिकाणी पसरत आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर वाहनांमध्ये अतिरिक्त स्वरूपात इंधन साठवण्यासाठी नागरिकांची गर्दी होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

यासंदर्भात जिल्ह्यामध्ये पेट्रोल व डिझेलचा साठा सध्यस्थितीत पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून इंधन पुरवठा सुरळीत सुरू आहे. जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप कंपनीचे विक्री अधिकारी व प्रतिनिधींना प्रशासनामार्फत इंधन पुरवठा नियमित ठेवण्याबाबत आवश्यक सूचना देण्यात आलेल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई निर्माण झालेली नाही. सर्व पेट्रोल पंपांवर नियमानुसार इंधनाचा पुरवठा सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊन पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी करू नये.

नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीसाठी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा. चुकीची अथवा दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करणाऱ्यांवर आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande