
गोगामुखच्या निवडणूक प्रचार सभेत केला दावा
गुवाहटी, 01 एप्रिल (हिं.स.) : आसाममध्ये गेल्या 10 वर्षा भाजपने चांगली विकास कामे केली आहेत. भाजपच्या कार्यकाळात राज्य प्रगतीपथावर आहे. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजप विजयाची हॅट्रिक करेल असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. राज्यातील गोगामुख येथे आज, बुधवारी निवडणूक प्रचार सभेला संबोधित करताना ते बोलत होते.
यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, मागील दशकात भाजप सरकारने आसाममध्ये ‘सेवा’ आणि ‘सुशासन’ यांचा नवा अध्याय सुरू केला आहे. या काळात 22 लाखांहून अधिक गरीब कुटुंबांना पक्की घरे देण्यात आली आहेत. तसेच, समान नागरी संहिता (यूसीसी) लागू करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आणि आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण करण्यावर भर दिला. सुबनसिरी जलविद्युत प्रकल्पामुळे राज्यातील पूरस्थितीवर नियंत्रण मिळवता येईल, असेही त्यांनी सांगितले. आसाममध्ये आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्याची क्षमता फक्त भाजप-नेतृत्वाखालील एनडीएकडे आहे. निवडणुकीनंतरची ही त्यांची पहिली सभा असून, मोठ्या प्रमाणात जमलेल्या जनसमुदायावरून भाजपच्या विजयाची खात्री असल्याचे त्यांनी नमूद केले. जनतेच्या आशीर्वादामुळे त्यांना पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा संधी मिळाली आहे. तसेच आसाममध्ये देखील घडेल. इथे देखील भाजप सरकार तिसऱ्यांदा सत्तेत येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पूर्वी सर्वानंद सोनवाल आणि सध्या हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखाली असममध्ये विकास आणि सुशासनाचा नवा काळ सुरू झाला आहे. पूर्वी काँग्रेस अनेक वर्षे सत्तेत होती. परंतु, त्यांनी आसामच्या विकासाकडे दुर्लक्ष केले. ब्रह्मपुत्र नदीवर कमी पूल बांधले गेले, तसेच समाजात विभागणी निर्माण केली, असा आरोप मोदींनी केला. काँग्रेसवर ‘कम्युनल व्हायोलन्स’ कायद्याच्या माध्यमातून मतपेटीचे राजकारण केल्याचा आरोप त्यांनी केला. हा कायदा बहुसंख्यांकांवर अन्याय करणारा होता, असे मोदी म्हणाले. आसामला नैसर्गिक संसाधनांची मोठी देणगी मिळाली आहे आणि आता राज्याला तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही मोठे स्थान मिळणार आहे. लवकरच असममध्ये सेमीकंडक्टर प्लांट सुरू होईल, ज्यामुळे राज्य आधुनिक तंत्रज्ञानाचे केंद्र बनेल असा विश्वास व्यक्त केला. तसेच ‘विकसित असम ते विकसित भारत’ हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी भाजपला निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.
------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी