
परभणी, 01 एप्रिल (हिं.स.)।
परभणीचे खासदार संजय जाधव यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन जनगणना 2027 मध्ये भटके विमुक्त (VJNT) व आदिवासी समाजासाठी स्वतंत्र कॉलम ठेवण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी सांगितले की, स्वातंत्र्यानंतर 75 वर्षे उलटूनही भटके विमुक्त व आदिवासी समाजाची अचूक गणना होत नाही. रोजगाराच्या शोधात सतत स्थलांतर करणाऱ्या या समाजातील अनेक कुटुंबांकडे स्थायी निवास नसल्याने ते रस्त्यावर किंवा तात्पुरत्या झोपड्यांमध्ये राहतात. त्यामुळे जनगणनेत त्यांची नोंद अनेकदा होत नाही. अंत्यसंस्कारासाठीही निश्चित जागा नसणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे या समाजासाठी जनगणनेत स्वतंत्र कॉलम तयार केल्यास त्यांच्या लोकसंख्येची अचूक नोंद होऊन शासकीय योजना व हक्कांचा लाभ मिळण्यास मदत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात केंद्र सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा खासदार जाधव यांनी व्यक्त केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis