
नवी दिल्ली , 10 एप्रिल (हिं.स.)। बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल (युनायटेड) चे राष्ट्रीय अध्यक्ष नीतीश कुमार आज राज्यसभेतून आपल्या नव्या राजकीय प्रवासाची सुरुवात करत आहेत. आज, शुक्रवारी दुपारी 12:12 वाजता त्यांनी राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. यासाठी विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यसभेत सर्व तयारी आधीच पूर्ण करण्यात आली होती.
मुख्यमंत्री नीतीश कुमार आज आपल्या निवासस्थानावरून निघून राज्यसभेत पोहोचले. यावेळी केंद्रीय मंत्री ललन सिंह, जदयूचे कार्यकारी अध्यक्ष संजय झा आणि उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी हेही त्यांच्या सोबत होते.16 मार्च रोजी नीतीश कुमार राज्यसभा सदस्य म्हणून निवडून आले होते. 30 मार्च रोजी त्यांनी विधान परिषद सदस्यपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आज त्यांनी राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. पुढील तीन ते चार दिवसांत ते आपला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सादर करणार आहेत.
दरम्यान, 9 एप्रिल रोजी दिल्लीत पोहोचलेल्या नीतीश कुमार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, “आता आम्ही इथेच राहणार आहोत, तिकडे नव्या लोकांना संधी मिळेल. इथे (दिल्लीत) बराच काळ काम केले आहे, आता पुन्हा इथेच काम करणार आहे. बिहारमध्ये 20 वर्षे खूप काम केले आहे आणि ते काम पुढेही सुरू राहील.”
राज्यसभेत शपथ घेतल्यानंतर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. त्यांच्या सोबत ललन सिंह आणि संजय झा हेही उपस्थित राहतील.बिहारमधील नव्या एनडीए सरकारच्या आराखड्याबाबत ते अमित शाह यांच्याशी चर्चा करू शकतात. नवीन मंत्रिमंडळ कसे असेल, कोणाला पुन्हा संधी मिळेल आणि कोणत्या नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल, यावर ते आपले मत मांडतील.
सूत्रांच्या माहितीनुसार, नीतीश कुमार आजच दिल्लीहून पाटणा येथे परतणार आहेत. त्यानंतर पाटणा येथे जनता दल (युनायटेड) च्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक घेतील. 13 एप्रिल रोजी ते कॅबिनेटची अंतिम बैठक घेऊ शकतात. त्यानंतर एनडीएच्या आमदारांच्या बैठकीत ते आपल्या राजीनाम्याची घोषणा करतील आणि त्यानंतर राज्यपालांकडे अधिकृतपणे राजीनामा सादर करतील.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode