
अमरावती, 02 एप्रिल (हिं.स.) : येथील उड्डाणपुलावरून लोखंडी तराफा (फळी) एका युवकाच्या डोक्यावर पडल्याने त्याचा मृत्यू झाला तर त्याचा सहकारी गंभीर जमखी झाला आहे.
श्रीक्षेत्र रिद्धपूर ते तिवसा महामार्गावरच्या रेल्वे क्रॉसिंगवर आरएसव्ही कन्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीद्वारे एकावर्षापासून उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. दाभेरी येथील ईश्वर भुरभुरे (वय ३४) आपल्या मित्रा सोबत घरचे सिलेंडर संपल्यामुळे दुचाकीने जात होते. उड्डाणपुला खालून जात असताना त्याला लावलेला लोखंडी तराफा ईश्वर यांच्या डोक्यावर पडला. त्याच ठिकाणी ते बेशुद्ध अवस्थेत पडले व त्यांच्या मित्राला पाठीला दुखापत झाल्यामुळे दोघांनाही चांदूर बाजार येथील रुग्णालयात नेण्यात आले. ईश्वर भुरभुरे यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने उपचार घेताना त्यांचा मृत्यू झाला. जखमी सहकार्यावर उपचार सुरू आहे.
सदर कंपनी मार्फत एक वर्षापेक्षा जास्त काळापासून उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या मार्गावरून नेहमी गाड्यांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. सबंधित कंपनीचे वाहतुकीचे व्यवस्थीत नियोजन केले नसल्याची ओरड नागरिकांची आहे. अव्यवस्थेमुळेच हा अपघात घडल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी