
गांधीनगर, 27 एप्रिल (हिं.स.)। दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर पंचमहाल जिल्ह्यातील कालोल जवळ सोमवारी एक रस्ता अपघात झाला. वेगाने जात असलेल्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार डिव्हायडर ओलांडून दुसऱ्या लेनमध्ये जाऊन पडली. हा अपघात इतका भीषण होता की कारमधील पाच जणांपैकी चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक व्यक्ती सुरक्षित बचावला.
माहितीनुसार, अपघातग्रस्त सर्वजण वडोदऱ्याचे रहिवासी होते. खिंजी कुटुंबातील सर्व सदस्य राजस्थानहून परत येत असताना कालोलजवळ हा अपघात झाला. मृतांची ओळख साजिद इक्बाल खिंजी (५५ वर्षे), इलियास इक्बाल खिंजी (५० वर्षे), इशाक इक्बाल खिंजी (४८ वर्षे) आणि रेहान अजगर खिंजी (३५ वर्षे) अशी पटली आहे. एका कुटुंबातील चार जणांच्या मृत्यूमुळे वडोदऱ्यात शोककळा पसरली आहे.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. कारमध्ये अडकलेल्या मृतदेहांना बाहेर काढल्यानंतर पोलिसांनी त्यांना शवविच्छेदनासाठी कालोलच्या रेफरल रुग्णालयात पाठवले आहे.सध्या या प्रकरणी पंचमहाल पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. कार डिव्हायडर ओलांडण्यामागील कारणे आणि अपघाताच्या वेळी वाहनाचा वेग याबाबत तपास केला जात आहे. प्राथमिक तपासात चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे मानले जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule