पाकिस्तानचा अफगाणिस्तान विद्यापीठावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू
काबुल , 28 एप्रिल (हिं.स.)।अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष पुन्हा तीव्र झाला आहे. तालिबान सरकारने दावा केला की पाकिस्तानने सोमवारी अफगाणिस्तानवर मोर्टार आणि रॉकेट हल्ले केले. हल्ल्यांमध्ये किमान 7 लोकांचा मृत्यू झाला, तर 75 हून अधिक लोक
पाकिस्तानचा अफगाणिस्तान विद्यापीठावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू


काबुल , 28 एप्रिल (हिं.स.)।अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष पुन्हा तीव्र झाला आहे. तालिबान सरकारने दावा केला की पाकिस्तानने सोमवारी अफगाणिस्तानवर मोर्टार आणि रॉकेट हल्ले केले. हल्ल्यांमध्ये किमान 7 लोकांचा मृत्यू झाला, तर 75 हून अधिक लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींमध्ये विद्यापीठाचे विद्यार्थी, मुले आणि सामान्य नागरिक यांचा समावेश आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, राजधानी असदाबादमध्ये घरांसोबतच सैयद जमालुद्दीन अफगाणी विद्यापीठालाही लक्ष्य करण्यात आले.

तालिबान सरकारचे उपप्रवक्ते हमदुल्लाह फितरत यांनी आरोप केला आहे की, हे हल्ले पाकिस्तानकडून करण्यात आले आहेत.त्यांचे म्हणणे आहे की, सोमवारी दुपारी 2 वाजता सुरू झालेल्या या हल्ल्यांमध्ये मोर्टार आणि रॉकेट डागण्यात आले. दुसरीकडे, पाकिस्तानने हे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. पाकिस्तानच्या माहिती मंत्रालयाचे म्हणणे आहे की, विद्यापीठ आणि निवासी भागांना लक्ष्य केल्याच्या बातम्या पूर्णपणे चुकीच्या आहेत. यापूर्वी रविवारी अफगाणिस्तानच्या कंदाहार प्रांतात पाकिस्तानसोबतच्या सीमेवर पुन्हा हिंसक चकमकीची घटना घडली होती. सूत्रांच्या हवाल्याने दावा केला की, स्पिन बोल्डक परिसरात रात्रीच्या वेळी दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला.

यात पाकिस्तानचे सहा सैनिक मारले गेले. एका सैनिकाला ओलीस ठेवून नेण्यात आल्याचेही सांगण्यात आले. मध्यरात्री चालवलेल्या या ऑपरेशनमध्ये तालिबानी सैनिक पाकिस्तानी सैनिकांची शस्त्रेही घेऊन गेले होते. मात्र, या दाव्यांची अद्याप स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही. असे सांगितले जात आहे की, ही चकमक तेव्हा सुरू झाली जेव्हा रात्री उशिरा पाकिस्तानकडून सीमापार गोळीबार झाला, ज्यात एका स्थानिक मुलाचा मृत्यू झाला. यानंतर तालिबानने प्रत्युत्तर दिले.

हि घटना अशा वेळी घडली आहे, जेव्हा दोन्ही देशांमध्ये आधीच तणाव आहे. पाकिस्तानने मार्चमध्ये राजधानी काबुलमधील एका व्यसनमुक्ती केंद्रावरही हल्ला केला होता, ज्यात 400 हून अधिक लोकांच्या मृत्यूचा दावा करण्यात आला होता. दोन्ही देशांनी मार्चमध्ये युद्धबंदी (सीजफायर) केली होती, ज्यामुळे अनेक आठवड्यांपासून सुरू असलेल्या रक्तरंजित चकमकी थांबल्या होत्या, पण आता परिस्थिती पुन्हा बिघडताना दिसत आहे. चीन व्यतिरिक्त तुर्कस्तान, कतार, संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबियानेही हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande