
बीड, 06 एप्रिल (हिं.स.)।
विश्वरत्न, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त बीड शहरात सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने एका भव्य आणि वैचारिक क्रांतीच्या उत्सवाला म्हणजेच या महोत्सवाचा जयभीम महोत्सवाला सुरवात झाली. बिगुल वाजला असून, आगामी १४ एप्रिलपर्यंत बीड शहर निळ्या रंगात न्हाऊन निघणार आहे.
१३ एप्रिलच्या रात्री बीडमध्ये समता ज्योत प्रज्वलित केली जाणार आहे. तर १४ एप्रिल रोजी सकाळी अभिवादन रॅली आणि सायंकाळी ६ ते १२ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत महापुरुषाच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक निघणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समितीने केले आहे.
मंगळवारी (ता. सात) दुपारी वक्तृत्व स्पर्धा आणि सायंकाळी चेतन चोपडे यांची संगीत रजनी होईल.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis