
बीड, 06 एप्रिल (हिं.स.)। तालुक्यातील ताडसोन्ना येथील मुंडे परिवाराने आईच्या स्मरणार्थ वडाचे झाड लावून पुढील विधी न करण्याचा निर्णय घेतला.घराच्या परिसरातच रक्षा विसर्जन करून आईच्या स्मरणार्थ वडाचे रोप लावून ताडसोन्ना येथील मुंडे परिवाराने कर्मकांडाला फाटा देत संवेदनशील आणि विवेकवादी निर्णय घेतला.
राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांच्या मातोश्री आश्रूबाई हरिभाऊ मुंढे (१००) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बीड तालुक्यातील ताडसोन्ना येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. रक्षा सावडण्यात आली. या रक्षेचे गंगेत विसर्जन न करता त्या शेतात आणि वृक्षारोपणात विसर्जित करण्याचा तसेच अक्षय वट अर्थात वडाचे झाड लावण्याचा आणि पुढील कोणत्याही प्रकारचा विधी न करण्याचा निर्णय मुंडे परिवाराने घेतला. याच दिवशी आईच्या स्मरणार्थ वडाचे रोपण करून पूजन करण्यात आले. यावेळी निवृत्त उपजिल्हाधिकारी अशोक मुंडे व तुकाराम मुंडे व प्रा. बाबासाहेब मुंडे, सुना, नातवंडे, नातेवाईक, ग्रामस्थ, तसेच आनंदग्रामचे दत्ता बारगजे आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis