
नांदेड, 06 एप्रिल (हिं.स.)। जिल्हा मुख्यालयापासून सुमारे १५० किलोमीटर अंतरावर असलेल्या आदिवासीबहुल किनवट तालुक्यासाठी अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे किनवटवासीयांना मोठा दिलासा मिळाला असून प्रशासकीय कामांसाठी जिल्हा मुख्यालयापर्यंत करावी लागणारी नागरिकांची पायपीट मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. दरम्यान, याच धर्तीवर किनवट येथे अपर पोलिस अधीक्षक कार्यालयही सुरू करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
दुर्गम भागात अपर जिल्हाधिकारी कार्यालयाची स्थापना होणे हा किनवटसाठी अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय आहे. हे कार्यालय कार्यान्वित झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावरील कामाचा ताण लक्षणीयरीत्या कमी होईल. विशेषतः भूसंपादन, नवीनमोजणी, तसेच प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनीशी संबंधित प्रलंबित प्रश्न स्थानिक पातळीवर मार्गी लागतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. याशिवाय महसुली दावे व प्रकरणांचा निकाल लवकर लागण्यास मदत होणार आहे.
नैसर्गिक आपत्ती किंवा अतिवृष्टीच्या काळात तातडीने निर्णय घेणे अधिक सोयीचे ठरणार आहे. विविध शासकीय दाखले आणि कागदपत्रांची पडताळणी प्रक्रियादेखील वेगवान होणार आहे. तसेच, आता अपर पोलिस अधीक्षक कार्यालय सुरू झाल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गंभीर गुन्ह्यांचा तपास स्थानिक स्तरावर वेगाने होईल, असा नागरिकांचा विश्वास आहे. त्यामुळे गुन्हेगारांवर वचक बसून कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होईल.
------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis