
रायगड, 07 एप्रिल, (हिं.स.)। कर्जत तालुक्यातील चिंचवली-डिकसळ परिसरात टेकडीवरील मातीचे मोठ्या प्रमाणावर उत्खनन सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे हे उत्खनन दिवस-रात्र सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, उत्खननासाठी केवळ अल्प प्रमाणात रॉयल्टी भरली जात असून प्रत्यक्षात मात्र मोठ्या प्रमाणात माती काढली जात आहे. त्यामुळे शासनाचा महसूल बुडत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच या उत्खननामुळे परिसरातील टेकड्यांचे स्वरूप बदलत असून पर्यावरणालाही मोठा धोका निर्माण होत असल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
यामुळे परिसरातील रस्त्यांवर धूळ, वाहतूक कोंडी तसेच अपघातांचा धोका वाढला असल्याचेही सांगितले जात आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही संबंधित यंत्रणांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
“हे उत्खनन कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? यामागे कोणाचा हात आहे का?” असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करून अवैध उत्खननावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)