
अमरावती, 08 अप्रैल (हिं.स.) : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत राबविलेले उपक्रम, कार्यक्रम व कामांचे मूल्यमापन 1 अप्रैल ते 30 जूनपर्यंत होणार आहे. या अभियानाचा उद्देश ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींची कार्यक्षमता वाढविणे आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदांना प्रोत्साहन देणे आहे.
अभियानांतर्गत ग्रामपंचायतींनी आपले उपक्रम, कार्यक्रम व केलेली कामे अधिकृत वेबसाईटवर लॉगिन करून निर्धारित कालावधीत स्वमूल्यांकन प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. सदर प्रक्रियेदरम्यान कोणत्याही अडचणी आल्यास राज्यस्तरीय तांत्रिक वॉररूम किंवा संबंधित गटविकास अधिकारी, पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधावा,
प्रस्ताव सादर करताना खालील सूचना पाळणे अनिवार्य आहे:
सर्व माहिती सत्य, अचूक व अद्ययावत असावी.
संबंधित कामांची छायाचित्रे जिओटॅग स्वरूपात अपलोड करावी,
सर्व नोंदी, अहवाल व कागदपत्रे पूर्णपणे अपलोड करावीत.
सादर केलेल्या आकडेवारी व छायाचित्रांमध्ये सुसंगती असावी.
प्रस्ताव निश्चित कालावधीत सादर करावा; विलंब झाल्यास प्रस्ताव ग्राह्य धरला जाणार नाही.
स्वमूल्यांकन प्रस्ताव सादर करताना ग्रामसभेमध्ये चर्चा करून लोकसहभाग सुनिश्चित करावा.
एकाच कामासाठी एकापेक्षा अधिक नोंदी अथवा चुकीची माहिती सादर करू नये.
यासंदर्भात अचलपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुधीर अरबट म्हणाले की, स्वमूल्यांकन प्रस्ताव सादर झाल्यानंतर विविध पथकांद्वारे त्याची खात्री व तपासणी करण्यात येईल, ज्यामुळे ग्रामीण भागातील प्रशासनाची कार्यक्षमता सुधारली जाईल.------------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी