
छत्रपती संभाजीनगर, 09 एप्रिल (हिं.स.)।
शहरात १ मेपासून जनगणनेचे काम सुरू होणार आहे. त्यासाठी तब्बल ३८०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात एक महिन्यात घरांची मोजणी केली जाणार आहे. पहिले १५ दिवस नागरिकांना स्वतः अॅपच्या माध्यमातून नोंदणी करण्याची संधी दिली जाईल
केंद्र शासनाने १ मेपासून देशभर जनगणनेचे काम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शहरातील जनगणनेची जबाबदारी महापालिकेवर असून, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून त्यांना प्रशिक्षण
देण्याची कामे सध्या केली जात आहेत. पहिल्या टप्प्यात १ ते १५ मे दरम्यान अॅपवरून नागरिकांना स्वतः माहिती भरता येईल. त्यानंतर नियुक्त कर्मचारी घरोघरी जाऊन घरांवर क्रमांक टाकतील. त्यासाठी शहराचे १० ब्लॉक तयार करण्यात आले आहेत. नोंदणीसाठी तयार करण्यात आलेल्या एका ब्लॉकमध्ये १२० ते १४० घरांची संख्या असेल, पण पहिल्या टप्प्यात त्यापेक्षा जास्त घरेही एका ब्लॉकमध्ये येऊ शकतात. जनगणनेच्या कामासाठी साडेतीन हजार कर्मचाऱ्यांची गरज आहे. मात्र १० टक्के जास्तीचे कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. त्यानुसार ३७०० ते ३८०० कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश काढले जातील. त्यात शिक्षकांसह महापालिका, शासकीय कर्मचाऱ्यांचा समावेश असेल.
देशभर होणारी ही जनगणना डिजिटल असेल. कागदाचा कुठेही वापर होणार नाही. लवकरच केंद्र शासनातर्फे अॅप दिले जाणार आहे.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis