
अमरावती, 01 मे (हिं.स.) : परतवाडा येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू जनसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत विविध वक्त्यांनी समाजातील मुद्द्यांवर आपली मते मांडली. कार्यक्रमादरम्यान परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सभेतील प्रमुख वक्त्या मीरा कडबे यांनी बोलताना ‘लव्ह जिहाद’ संदर्भात सावध राहण्याचे आवाहन करत समाजाने जागरूक राहणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. त्यांनी पालकांनी विशेषतः मुलींवर लक्ष ठेवावे आणि त्यांना संस्कारक्षम शिक्षण द्यावे, असेही सांगितले.
दुसरे वक्ते अटल पांडे यांनी बोलताना कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी प्रशासनाची असली तरी समाजानेही सजग राहण्याची गरज असल्याचे मत मांडले. त्यांनी विविध सामाजिक घटनांच्या पार्श्वभूमीवर हिंदू समाजाने संघटित राहण्याचे आवाहन केले.
सभेत नऊ कन्यांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे, नगराध्यक्ष रूपाली माथने, ऍड. प्रमोदसिंह गड्रेल यांच्यासह अनेक मान्यवर आणि शेकडो नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान मांडण्यात आलेल्या काही मतांमुळे चर्चा रंगली असून, पोलिस प्रशासनाने परिसरात शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी विशेष काळजी घेतली.
---------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी