केरळमध्ये महिलांना मोफत बस प्रवास, आशा व अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ
तिरुवनंतपुरम, 18 मे (हिं.स.) : केरळमध्ये वी.डी. सतीशन यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारने सोमवारी झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाच्या जनकल्याणकारी निर्णयांना मंजुरी दिली. महिलांसाठी मोफत बस प्रवास, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र
KERALA  CM CABINET SEVERAL DECISIONS


KERALA  CM CABINET SEVERAL DECISIONS


तिरुवनंतपुरम, 18 मे (हिं.स.) : केरळमध्ये वी.डी. सतीशन यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारने सोमवारी झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाच्या जनकल्याणकारी निर्णयांना मंजुरी दिली. महिलांसाठी मोफत बस प्रवास, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र विभागाची स्थापना तसेच आशा आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीसारख्या निर्णयांमुळे सरकारने आपल्या प्राधान्यक्रमांचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

तब्बल 10 वर्षांनंतर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट पुन्हा सत्तेत आले आहे. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर वी.डी. सतीशन यांच्या अध्यक्षतेखाली पहिली मंत्रिमंडळ बैठक पार पडली.बैठकीनंतर पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री सतीशन यांनी सांगितले की, “इंदिरा गॅरंटी” कार्यक्रमांतर्गत महिलांना केरळ राज्य मार्ग परिवहन महामंडळ (केएसआरटीसी) बसमध्ये मोफत प्रवास सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही योजना 15 जूनपासून लागू होणार असून पात्रता आणि अंमलबजावणीबाबतची सविस्तर माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

महिलांचा आर्थिक सहभाग वाढवणे आणि त्यांची स्वतंत्र हालचाल सुनिश्चित करणे हा या योजनेमागील उद्देश असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. या निर्णयामुळे लाखो महिलांना थेट आर्थिक दिलासा मिळणार असून शिक्षण, रोजगार आणि दैनंदिन कामांसाठी प्रवास अधिक सुलभ होणार आहे.मंत्रिमंडळाने ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र विशेष विभाग स्थापन करण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी दिली आहे. देशातील आपल्या प्रकारातील हा पहिलाच उपक्रम असणार असल्याचा दावा सरकारने केला आहे. या संदर्भात जपानमधील वृद्ध सेवा व्यवस्थेचा अभ्यास करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री सतीशन यांनी सांगितले.

याशिवाय आशा कार्यकर्त्यांना अतिरिक्त तीन हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला असून अंगणवाडी सेविकांच्या मासिक मानधनात एक हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तसेच मध्यान्ह भोजन योजनेतील स्वयंपाकी कर्मचारी, आया आणि पूर्व-प्राथमिक शिक्षकांच्या मानधनातही प्रत्येकी एक हजार रुपयांची वाढ जाहीर करण्यात आली आहे.सरकारने ‘नव केरळ यात्रा’ दरम्यान झालेल्या कथित पोलिस अत्याचारांची विशेष चौकशी करण्याचाही निर्णय घेतला आहे. तक्रारींची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, वरिष्ठ आमदार जी. सुधाकरन यांची प्रोटेम सभापती म्हणून नियुक्ती करण्यात आली असून जयजू बाबू यांची राज्याचे महाधिवक्ता आणि टी. आसफ अली यांची अभियोजन महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.यापूर्वी तिरुवनंतपुरम येथील सेंट्रल स्टेडियम येथे आयोजित समारंभात राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी वी.डी. सतीशन यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यांच्या समवेत 20 सदस्यीय मंत्रिमंडळानेही शपथ घेतली.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande