

नवी दिल्ली, 20 मे (हिं.स.)। भारत आणि इटली यांनी आपल्या द्विपक्षीय संबंधांना नवे आणि ऐतिहासिक स्वरूप देत ‘विशेष धोरणात्मक भागीदारी’ची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इटली दौऱ्यादरम्यान झालेल्या शिखर बैठकीत दोन्ही देशांनी संबंधांना सर्वोच्च पातळीवर नेण्याचा निर्णय घेतला. रोम येथे झालेल्या या बैठकीत इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान मोदी यांचे विशेष स्वागत केले. त्यांनी सांगितले की, सन २००० नंतर तब्बल २६ वर्षांनी एखाद्या भारतीय पंतप्रधानांचा हा पहिला द्विपक्षीय इटली दौरा असून त्यामुळे दोन्ही देशांतील संबंधांना नवी ऊर्जा मिळणार आहे.
द्विपक्षीय चर्चेनंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत मेलोनी यांनी आर्थिक सहकार्य वाढवण्यावर भर दिला. सध्या भारत आणि इटली यांच्यातील व्यापार सुमारे १४ अब्ज युरो इतका असून तो २०२९ पर्यंत २० अब्ज युरोंपर्यंत नेण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य दोन्ही देशांनी ठेवले आहे. भारत आणि युरोपीय संघामधील मुक्त व्यापार कराराच्या माध्यमातून हे उद्दिष्ट साध्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारताच्या विकास प्रक्रियेत सध्या ४०० हून अधिक इटालियन कंपन्या सक्रियपणे सहभागी असून नवी दिल्लीत ‘इनोव्हेट इंडिया इनिशिएटिव्ह’ अंतर्गत विशेष केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून दोन्ही देशांतील नवउद्योजक, विद्यापीठे, उद्योग आणि संशोधन संस्था यांच्यातील सहकार्य वाढवले जाणार आहे.
पंतप्रधान मोदी यांनी या भागीदारीसाठी नवे दृष्टीकोन मांडताना सांगितले की, इटलीची ओळख उत्कृष्ट रचना आणि अचूकतेसाठी आहे, तर भारत मोठ्या प्रमाणातील उत्पादन, अमर्याद प्रतिभा आणि परवडणाऱ्या नवकल्पनांसाठी ओळखला जातो. त्यामुळे आता ‘भारत आणि इटलीमध्ये रचना व विकास आणि जगासाठी वितरण’ या तत्त्वावर दोन्ही देश काम करतील. यासाठी ‘भारत-इटली संयुक्त सामरिक कृती आराखडा २०२५-२०२९’ तयार करण्यात आला आहे.
संरक्षण आणि सुरक्षाविषयक सहकार्यालाही दोन्ही देशांनी विशेष महत्त्व दिले. मोदी यांनी सांगितले की, संरक्षण क्षेत्रातील सहकार्य हे परस्पर विश्वासाचे प्रतीक असून दोन्ही देशांच्या संरक्षण उद्योगांमध्ये सहनिर्मिती आणि संयुक्त उत्पादनाला चालना मिळणार आहे. समुद्री शक्ती म्हणून भारत आणि इटली बंदरे आधुनिकीकरण, जहाज वाहतूक, दळणवळण आणि रसद व्यवस्थापन क्षेत्रातही एकत्र काम करतील. दहशतवाद हा मानवतेसमोरील मोठा धोका असल्याचे नमूद करत दोन्ही देशांनी दहशतवादी आर्थिक जाळ्यांविरोधात कठोर पावले उचलण्याचा निर्धार व्यक्त केला.
मोदी यांनी दोन्ही देशांतील सांस्कृतिक आणि लोकसंपर्क संबंधांचाही उल्लेख केला. संस्कृत आणि लॅटिन या दोन्ही भाषा एकाच भाषा परिवारातील असल्यामुळे भारत आणि इटली यांचे नाते ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाशी जोडलेले असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील वर्षी भारत-इटली संबंधांच्या ८० व्या वर्धापनदिनानिमित्त ‘संस्कृती वर्ष’ साजरे करण्यात येणार असून इटलीतील भारतीय समुदाय हा दोन्ही देशांतील संबंधांचा महत्त्वाचा दुवा असल्याचेही त्यांनी नमूद केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule