

नवी दिल्ली, 19 मे (हिं.स.)। दोन आशियाई देशांच्या दौऱ्यावर निघालेले संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी व्हिएतनामचे उपपंतप्रधान आणि संरक्षणमंत्री जनरल फान वान जियांग यांच्यासोबत हनोई येथे द्विपक्षीय चर्चा केली. त्यांनी हिंद-प्रशांत क्षेत्रात शांतता, स्थैर्य, सुरक्षा, संरक्षा आणि नौवहन स्वातंत्र्य कायम राखण्याच्या आपल्या बांधिलकीचा पुनरुच्चार केला. दोन्ही मंत्र्यांनी व्हिएतनामच्या एअर फोर्स ऑफिसर्स कॉलेजमध्ये ‘भाषा प्रयोगशाळे’चे व्हर्च्युअल उद्घाटन केले. भारत आणि व्हिएतनाम यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि क्वांटम तंत्रज्ञान क्षेत्रात एक सामंजस्य करार केला. संरक्षणमंत्र्यांनी न्हा ट्रांग येथील टेलिकम्युनिकेशन्स विद्यापीठात एआय प्रयोगशाळा स्थापन करण्याची घोषणाही केली.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह १८ ते १९ मेदरम्यान व्हिएतनाम दौऱ्यावर असून, त्यानंतर ते १९ ते २१ मेदरम्यान दक्षिण कोरियाचा दौरा करणार आहेत. त्यांनी मंगळवारी हनोई येथे व्हिएतनामचे उपपंतप्रधान आणि राष्ट्रीय संरक्षणमंत्री जनरल फान वान जियांग यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली. दोन्ही मंत्र्यांनी भारत-व्हिएतनाममधील वाढत्या संरक्षण भागीदारीचा आढावा घेतला आणि सागरी सुरक्षा, संरक्षण उद्योग, प्रशिक्षण तसेच प्रादेशिक स्थैर्य या क्षेत्रांतील सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या उपायांवर चर्चा केली. दोन्ही बाजूंनी परस्पर हिताशी संबंधित प्रादेशिक आणि जागतिक सुरक्षा घडामोडींवर विचारांची देवाणघेवाण केली.
दोन्ही नेत्यांनी लष्करी प्रशिक्षण, संरक्षण उद्योग सहकार्य, सागरी सुरक्षा, क्षमता वृद्धी, संयुक्त राष्ट्र शांतता मोहीम, सायबर सुरक्षा आणि उच्चस्तरीय आदान-प्रदान यांसह विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याच्या मार्गांवर चर्चा केली. याशिवाय नियमित संवाद, संयुक्त सराव आणि आदान-प्रदान कार्यक्रमांच्या माध्यमातून दोन्ही देशांच्या संरक्षण दलांमधील सहकार्य वाढवण्यावरही सहमती व्यक्त करण्यात आली. दोन्ही मंत्र्यांनी हिंद-प्रशांत क्षेत्रात शांतता, स्थैर्य, सुरक्षा, संरक्षा आणि नौवहन स्वातंत्र्य कायम राखण्याच्या महत्त्वावर भर दिला. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्हिएतनामसोबत भारताची ‘विस्तारित व्यापक रणनीतिक भागीदारी’ अधिक मजबूत करण्याचा तसेच व्हिएतनामच्या संरक्षण आधुनिकीकरण आणि क्षमता वृद्धी उपक्रमांना सहकार्य देण्याचा भारताचा संकल्प पुन्हा अधोरेखित केला.
जनरल फान वान जियांग यांनी भारताच्या सातत्यपूर्ण पाठिंब्याचे कौतुक करत दोन्ही देशांतील जुनी मैत्री आणि वाढती रणनीतिक भागीदारी यावर भर दिला. दोन्ही संरक्षणमंत्र्यांनी व्हर्च्युअल माध्यमातून व्हिएतनामच्या एअर फोर्स ऑफिसर्स कॉलेजमध्ये ‘लँग्वेज लॅब’चे उद्घाटन केले. ही प्रयोगशाळा भारताच्या मदतीने उभारण्यात आली आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी न्हा ट्रांग येथील टेलिकम्युनिकेशन्स विद्यापीठात ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स लॅब’ स्थापन करण्याची घोषणाही केली. मिलिटरी कॉलेज ऑफ टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, भारत आणि टेलिकम्युनिकेशन्स विद्यापीठ, व्हिएतनाम यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्वांटम तंत्रज्ञान क्षेत्रात सामंजस्य करार केला असून, तो दोन्ही देशांतील ‘उत्तम व्यापक रणनीतिक भागीदारी’मधील आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.
द्विपक्षीय बैठकीनंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्हिएतनामचे महासचिव आणि राष्ट्राध्यक्ष टो लाम यांची भेट घेतली. संरक्षण आणि सुरक्षा, व्यापार व गुंतवणूक, सागरी सहकार्य, संपर्क सुविधा, डिजिटल परिवर्तन आणि लोकांमधील परस्पर संबंध यांसह विविध क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्याबाबत भारताची बांधिलकी त्यांनी पुन्हा व्यक्त केली. दोन्ही नेत्यांनी भारत-व्हिएतनाममधील मजबूत आणि दीर्घकालीन मैत्रीचा पुनरुच्चार केला. भारत-व्हिएतनाम व्यापक रणनीतिक भागीदारी सातत्याने अधिक मजबूत होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. भारताच्या आपल्या पूर्वीच्या दौऱ्याची आठवण सांगताना व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष टो लाम यांनी येत्या काळात द्विपक्षीय संबंध आणखी बळकट होतील, असा विश्वास व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule