
अमरावती, 20 मे (हिं.स.)
देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास आता विदर्भातही वेगाने पोहोचला असून केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय)ने महाराष्ट्रातील तपासाची व्याप्ती वाढविली आहे. नांदेड, लातूर, नाशिक आणि पुणे येथील कारवाईनंतर आता नागपूर आणि चंद्रपूर येथे छापे टाकण्यात आल्याने अमरावतीतही खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमरावतीसह विदर्भातील काही शहरांवर तपास यंत्रणांचे लक्ष केंद्रीत झाले असून, येत्या काही दिवसांत मोठी कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.मंगळवारी सकाळी सीबीआयच्या पथकाने नागपूरच्या गणेशपेठ आणि कोतवाली पोलीस ठाण्यांच्या हद्दीत राहणाऱ्या दोन विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे टाकले. विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांची चौकशी करण्यात आली. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील एका विद्यार्थ्याच्या घरीही तपास करण्यात आला. प्राथमिक तपासात हे तिन्ही विद्यार्थी लातूरमधील प्रसिद्ध कोचिंग संचालक शिवराज मोटेगावकर यांच्या संस्थेशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे.या घडामोडींनंतर राज्यभरातील प्रवेश एजन्सी, कोचिंग क्लासेस आणि संशयित दलालांच्या हालचालींवर तपास यंत्रणांनी बारीक लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. विदर्भातील शैक्षणिक केंद्र म्हणून ओळख असलेल्या अमरावतीत मोठ्या प्रमाणावर नीट आणि स्पर्धा परीक्षांच्या कोचिंग संस्था कार्यरत आहेत. त्यामुळे या प्रकरणाशी संबंधित कोणते धागेदोरे येथेही सापडतात का, याची पडताळणी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
३ मे रोजी झालेल्या नीट परीक्षेच्या तब्बल ४२ तास आधी काही कोचिंग संस्थांकडे प्रश्नपत्रिका पोहोचल्याचा संशय आहे. या प्रकरणात आतापर्यंत सीबीआयने पाच राज्यांत छापे टाकून १० आरोपींना अटक केली आहे. कोचिंग ऑपरेटर, प्रवेश एजन्सी आणि प्रश्नपत्रिका खरेदी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नेटवर्कचा शोध घेण्यासाठी दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, पुणे, नाशिक, लातूर आणि अहिल्यानगरसह विविध शहरांत तपास मोहीम सुरू आहे.अमरावतीतील कोचिंग संस्थांमध्ये सध्या अस्वस्थतेचे वातावरण असून, तपासाच्या हालचालींमुळे शैक्षणिक क्षेत्रात चर्चांना उधाण आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी