आयपीएल २०२६ : गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावत आरसीबीचा क्वालिफायर १ मध्ये प्रवेश
हैदराबाद, 23 मे (हिं.स.)आयपीएल २०२६ हंगामात अव्वल दोन स्थानांवर पोहोचण्यासाठी सनरायझर्स हैदराबादला रॉयल चॅलेंजर्स बंगळूरविरुद्ध मोठ्या विजयाची गरज होती. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने २५५ धावांचा डोंगर उभा केला, पण त्यांचे गोलंदाज आरसीबीला १६६ धाव
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ


हैदराबाद, 23 मे (हिं.स.)आयपीएल २०२६ हंगामात अव्वल दोन स्थानांवर पोहोचण्यासाठी सनरायझर्स हैदराबादला रॉयल चॅलेंजर्स बंगळूरविरुद्ध मोठ्या विजयाची गरज होती. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने २५५ धावांचा डोंगर उभा केला, पण त्यांचे गोलंदाज आरसीबीला १६६ धावांवर रोखण्यात अपयशी ठरले. यामुळे हैदराबादच्या अव्वल दोन स्थानांवर पोहोचण्याच्या आशा संपुष्टात आल्या आणि आरसीबी व गुजरात टायटन्स यांच्याप्रमाणे १८ गुणांवर समान गुण असूनही संघाला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. अभिषेक शर्मा (५६), इशान किशन (७९) आणि हेनरिक क्लासेन (५१) यांनी हैदराबादसाठी शानदार खेळी केली, पण ते संघाला अव्वल दोन स्थानांवर नेऊ शकले नाहीत. यामुळे क्वालिफायर १ मधून बाहेर पडावे लागले. आरसीबी अव्वल स्थानी राहिली आणि २६ मे रोजी धरमशाला येथे क्वालिफायर १ मध्ये गुजरातचा सामना करणार आहे.

सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सपाट खेळपट्टीवर, अभिषेक शर्माने २२ चेंडूंमध्ये चार चौकार आणि पाच षटकारांसह धडाकेबाज ५६ धावा ठोकल्या. ट्रॅव्हिस हेडने १६ चेंडूंमध्ये पाच चौकारांसह २६ धावा केल्या. त्यानंतर इशान किशनने ४३ चेंडूंमध्ये आठ चौकार आणि तीन षटकारांसह शानदार ७९ धावा करून आपली छाप पाडली. हेनरिक क्लासेननेही ४५ चेंडूंमध्ये दोन चौकार आणि पाच षटकारांसह ५१ धावा केल्या. या खेळींमुळे हैदराबादला २० षटकांत चार गडी गमावून २५५ धावांचा डोंगर उभा करता आला.

२५६ धावांचे लक्ष्य गाठताना, आरसीबीचा प्रथमच सलामीवीर ठरलेला व्यंकटेश अय्यर याने १९ चेंडूंमध्ये चार चौकार आणि चार षटकारांसह ४४ धावा केल्या. मात्र, विराट कोहलीला ११ चेंडूंमध्ये केवळ १५ धावा करता आल्या, तर देवदत्त पडिक्कलने १४ चेंडूंमध्ये २१ धावा केल्या. ९४ धावांत तीन गडी गमावल्यानंतर, कर्णधार रजत पाटीदारने डाव सावरला आणि आरसीबीला आवश्यक धावसंख्येपर्यंत पोहोचवले, ज्यामुळे हैदराबादला पहिल्या दोन स्थानांवर येण्यापासून रोखले. त्यांच्याकडून कृणाल पांड्याने ३१ चेंडूंमध्ये पाच चौकारांसह ४१ धावा केल्या, तर कर्णधार पाटीदारने ३९ चेंडूंमध्ये सहा चौकार आणि एका षटकारासह ५६ धावा केल्या. परिणामी, आरसीबीला ४ गडी गमावून केवळ २०० धावाच करता आल्या आणि ५५ धावांनी पराभव पत्करून पहिल्या दोन स्थानांवरील आपले स्थान कायम राखता आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande