
मुंबई, 03 मे (हिं.स.)इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळण्याची संधी नसतानाही, महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला टी२० मुंबई लीगच्या लिलावात सर्वाधिक बोलींपैकी एक मिळाली. आयपीएल २०२६ मध्ये लखनौ सुपर जायंट्सकडून अद्याप एकही सामना न खेळलेल्या अर्जुनला एआरसीएस अंधेरी संघाने १० लाख रुपयांना विकत घेतले, जी त्याच्या २ लाख रुपयांच्या मूळ किमतीपेक्षा ४०० टक्के अधिक आहे. परिणामी, अर्जुनला त्याच्या आयपीएलमधील पगाराच्या ३३.३% रक्कम एलएसजीकडून मिळेल.
मुंबई क्रिकेट असोसिएशनने टी२० मुंबई लीगच्या चौथ्या हंगामासाठी पुरुष क्रिकेटपटूंचा लिलाव आयोजित केला होता, ज्यात आकाश पारकर, प्रसाद पवार, मुशीर खान आणि अर्जुन तेंडुलकर हे सर्वाधिक महागडे क्रिकेटपटू विकले गेले. चौथ्या हंगामाच्या लिलावात फ्रँचायझींमध्ये तीव्र स्पर्धा पाहायला मिळाली. अष्टपैलू आकाश पारकर हा सर्वात महागडा खेळाडू ठरला, ज्याला सोबो मुंबई फाल्कन्सने १२ लाख रुपयांना करारबद्ध केले. अंधेरी फ्रचायझीने यष्टीरक्षक-फलंदाज प्रसाद पवारला ११.५० लाख रुपयांना, अष्टपैलू मुशीर खानला ११ लाख रुपयांना आणि अर्जुन तेंडुलकरला १० लाख रुपयांना संघात सामील करून घेतले.
अर्जुन तेंडुलकरने गेल्या काही हंगामांपासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोव्याचे प्रतिनिधित्व केले आहे. गेल्या १२ महिन्यांत त्याने कोणत्याही राज्य संघटनेच्या टी२० स्पर्धेत भाग घेतला नसल्यामुळे, त्याला लिलाव आणि स्पर्धेसाठी बीसीसीआयकडून आधीच मंजुरी मिळाली होती.
या लीगमध्ये अनेक स्टार भारतीय क्रिकेटपटूंचाही समावेश असेल, ज्यांना लिलावापूर्वी 'आयकॉन प्लेयर' म्हणून घोषित करण्यात आले होते आणि त्यांच्या फ्रँचायझींनी कायम ठेवले होते. या यादीत सूर्यकुमार यादव (ट्रायम्फ नाइट्स मुंबई नॉर्थ ईस्ट), श्रेयस अय्यर (सोबो मुंबई फाल्कन्स) आणि अजिंक्य रहाणे (नॉर्थ मुंबई पँथर्स) यांचा समावेश आहे.
मुंबई टी२० लीग आयपीएल २०२६ हंगाम संपल्यानंतर जूनमध्ये सुरू होईल. बीसीसीआयच्या नियमांनुसार, एका क्रिकेटपटूला १२ महिन्यांच्या कालावधीत आयपीएल सोडून केवळ एकाच राज्यस्तरीय लीगमध्ये खेळण्याची परवानगी आहे. हा १२ महिन्यांचा कालावधी, क्रिकेटपटूने त्या लीगमध्ये शेवटचा सामना खेळलेल्या दिवसापासून सुरू होतो.
अर्जुन तेंडुलकरने भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई आणि गोवा संघाकडून २४ प्रथम-श्रेणी सामन्यांमध्ये ६८५ धावा केल्या असून ५२ बळी घेतले आहेत. तसेच, त्याच्या नावावर २४ लिस्ट ए सामन्यांमध्ये २६ बळी आणि २९ टी-२० सामन्यांमध्ये ३५ बळी आहेत. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये पाच सामने खेळून तीन बळी घेतले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे