पावसाळ्यातील आव्हाने पेलण्यासाठी कोकण रेल्वे सज्ज
रत्नागिरी, 13 जून (हिं.स.) । मान्सूनमुळे कोकणात निसर्गसौंदर्य बहरत असले, तरी मुसळधार पाऊस आणि कठीण भौगोलिक परिस्थितीमुळे रेल्वे संचालनासमोर मोठी आव्हानेही उभी राहतात. प्रवाशांची सुरक्षा आणि अखंड रेल्वे सेवा या सर्वोच्च प्राधान्यांना लक्षात घेऊन ही
कोकण रेल्वे आढावा बैठक


रत्नागिरी, 13 जून (हिं.स.) । मान्सूनमुळे कोकणात निसर्गसौंदर्य बहरत असले, तरी मुसळधार पाऊस आणि कठीण भौगोलिक परिस्थितीमुळे रेल्वे संचालनासमोर मोठी आव्हानेही उभी राहतात. प्रवाशांची सुरक्षा आणि अखंड रेल्वे सेवा या सर्वोच्च प्राधान्यांना लक्षात घेऊन ही आव्हाने पेलण्यासाठी कोकण रेल्वे सज्ज असल्याची ग्वाही देणारे पत्रक कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बं. नारकर यांनी प्रसिद्धीला दिले आहे.

सक्रिय आणि दूरदृष्टीपूर्ण दृष्टिकोनाचा भाग म्हणून कोकण रेल्वेने पायाभूत सुविधांचे बळकटीकरण, भू-सुरक्षा उपाययोजना, रिअल-टाइम निरीक्षण प्रणाली, वाढीव गस्त आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा यांचा समावेश असलेली सर्वसमावेशक मान्सून तयारी योजना राबविली आहे. भू-सुरक्षा आणि निरीक्षण तंत्रज्ञानातील सातत्यपूर्ण प्रगतीमुळे कोकण रेल्वे मान्सून हंगामातील आव्हानांना तोंड देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे.

कोकण रेल्वेवर १५ जून ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत मान्सून वेळापत्रक लागू राहील. सुरक्षित आणि विश्वासार्ह वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी मार्गावरील विविध विभागांमध्ये वेगमर्यादा लागू करण्यात येतील. उतारांची स्थिरता वाढविण्यासाठी निवडक ठिकाणी कटिंग स्लोप्स सपाट करणे आणि सॉइल नेलिंगची कामे करण्यात आली आहेत. बोगदे आणि कटिंग भागांमध्ये रॉक बोल्टिंग व शॉटक्रीटिंगची कामे करून भूगर्भीय संरचना मजबूत करण्यात आल्या असून दरडी कोसळण्याला प्रतिबंध कमी करण्यात आला आहे. गॅबियन भिंती, रिटेनिंग वॉल्स, मायक्रोपाइल्स आणि बोल्डर नेटिंग यांसारख्या संरक्षणात्मक संरचना उभारून भू-तांत्रिक जोखमींवर नियंत्रण ठेवण्यात आले आहे. साइड ड्रेन्स आणि कॅचवॉटर ड्रेन्सची साफसफाई व काँक्रीट लाइनिंग पूर्ण करण्यात आली असून पावसाळ्यात पाण्याचा निचरा सुरळीत होईल याची काळजी घेण्यात आली आहे. सुरू असलेल्या आणि पूर्ण झालेल्या भू-सुरक्षा कामांमुळे संपूर्ण मार्गावरील दगड कोसळणे आणि माती घसरण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. संवेदनशील ठिकाणी पोर्टेबल डीवॉटरिंग पंप तैनात करण्यात आले आहेत. या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे मागील दशकात मान्सून काळात दगड कोसळल्यामुळे कोकण रेल्वेच्या सेवेत कोणताही मोठा व्यत्यय आलेला नाही.

संवेदनशील ठिकाणी ६५७ प्रशिक्षित कर्मचारी चोवीस तास गस्तीसाठी तैनात केले जाणार आहेत. आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसादासाठी चिपळूण, रत्नागिरी, कणकवली आणि वेर्णा येथे BRN वॅगनवर बसविलेले उत्खनन यंत्र (एक्स्कॅव्हेटर) सज्ज ठेवण्यात आले आहे. रेल्वे मेंटेनन्स वाहने (Rail Maintenance Vehicles ) वीर, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर रोड, कुडाळ, वेर्णा, कारवार, भटकल आणि उडुपी या ९ महत्त्वाच्या ठिकाणी तैनात आहेत. माणगाव, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, करमळी, कारवार आणि उडुपी येथे टॉवर वॅगन्स तत्पर ठेवण्यात आल्या आहेत.

कमी दृश्यमानतेच्या परिस्थितीत लोको पायलटांना रेल्वेचा वेग ४० किमी प्रतितास मर्यादित ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रेल्वे रुळांच्या पातळीपेक्षा १०० मिमीपेक्षा अधिक पाणी साचल्यास गाडी थांबविण्यात येईल. पाणी ओसरल्यानंतरच रेल्वे सेवा पुन्हा सुरू केली जाईल. माणगाव, दिवाणखवटी, चिपळूण, संगमेश्वर रोड, वैभववाडी रोड, कुडाळ, मडगाव जंक्शन, काणकोण, कारवार, भटकल आणि उडुपी येथे पूर्ण वैद्यकीय साहित्य व उपकरणांसह अपघात निवारण वैद्यकीय उपकरणे (ARME Scale-II) उपलब्ध आहेत. ऑपरेशन थिएटर आणि आपत्कालीन वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज स्वयंचलित अपघात निवारण वैद्यकीय वाहने (Accident Relief Medical Vans) रत्नागिरी आणि वेर्णा येथे तैनात आहेत. अपघात निवारण रेल्वे (Accident Relief Train) वेर्णा येथे तैनात असून १५ मिनिटांत रवाना होण्यासाठी सज्ज आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी स्थानिक संस्थांमार्फत जेसीबी, पोकलेन आणि डंपर उपलब्ध ठेवण्यात आले आहेत. तातडीच्या प्रतिसादासाठी बॅलेस्टने भरलेल्या रेल्वेगाड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

सुरक्षा कर्मचाऱ्यांना नियंत्रण कक्ष व स्थानकांशी संपर्कासाठी मोबाइल फोन देण्यात आले आहेत. लोको पायलट आणि ट्रेन मॅनेजर्सना वॉकी-टॉकी देण्यात आले असून सर्व स्थानकांवर २५ वॉट VHF संच उपलब्ध आहेत. आपत्कालीन परिस्थितीत नियंत्रण कार्यालयाशी त्वरित संपर्क साधण्यासाठी मार्गावर प्रत्येक १ किमी अंतरावर आणि २ किमीपेक्षा जास्त लांबीच्या बोगद्यांमध्ये प्रत्येक ४०० मीटरवर आपत्कालीन संप्रेषण सॉकेट्स (EMC) बसविण्यात आले आहेत. ART आणि ARMV मध्ये सॅटेलाइट फोनची सुविधा आहे.

माणगाव, चिपळूण, रत्नागिरी, विलवडे, कणकवली, मडगाव, कारवार, भटकल आणि उडुपी येथे स्वयं-नोंदणी करणारे पर्जन्यमापक (Self-recording rain gauges ) कार्यरत आहेत. घोड नदी (इंदापूर–माणगाव), काळ नदी (माणगाव–गोरेगाव), सावित्री नदी (वीर–सापे वामणे) आणि वशिष्ठी नदी (चिपळूण–कामथे) येथील महत्त्वाच्या पुलांवर पूर सूचना प्रणाली कार्यरत असून धोकादायक पाणीपातळीची सूचना अधिकाऱ्यांना दिली जाते. पानवल व्हायाडक्ट (रत्नागिरी – निवसर), मांडवी पूल (थिवी – करमळी) , झुआरी पूल (करमळी – वेर्णा) आणि शरावती पूल (होन्नावर – मंकी) येथे वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी अॅनेमोमीटर बसविण्यात आले आहेत.

मान्सून काळात बेलापूर, रत्नागिरी आणि मडगाव येथे २४x७ नियंत्रण कक्ष कार्यरत असतील. सर्व ७२ स्थानकांवरील CCTV प्रणालींचे निरीक्षण स्टेशन मास्टर कार्यालये आणि मार्गावरील ९ RPF चौक्यांमधून केले जाते. कोकण रेल्वे भारतीय हवामान विभागाशी समन्वय साधून दररोज हवामानाचा आढावा घेते आणि हवामान अंदाजानुसार संबंधित अधिकाऱ्यांना SMS सूचना पाठवते. चिपळूण, रत्नागिरी, वेर्णा, मडगाव, कारवार आणि उडुपी येथे वैद्यकीय पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. कोकण रेल्वेच्या सर्व गाड्यांच्या पॅन्ट्री कारमध्ये अत्यावश्यक औषधांनी युक्त प्रथमोपचार पेट्या उपलब्ध आहेत.

प्रवासी www.konkanrailway.com या संकेतस्थळावर किंवा १३९ या हेल्पलाइन क्रमांकावर रेल्वेची अद्ययावत माहिती मिळवू शकतात. कोकण रेल्वे सुरक्षितता, विश्वासार्ह सेवा आणि प्रवासी सुविधा यांसाठी कटिबद्ध आहे. व्यापक तयारी आणि सतत देखरेखीच्या माध्यमातून कोकण रेल्वे संपूर्ण मान्सून हंगामात सुरक्षित आणि सुरळीत रेल्वे सेवा सुनिश्चित करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे, असेही पत्रकात म्हटले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande