
रत्नागिरी, 13 जून (हिं.स.) । रत्नागिरी शहराच्या विकासासाठी महायुती सरकारकडून पुरेसा निधी मिळविण्यात भाजप शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
रत्नागिरी शहरातील प्रभाग १, २, ३, ७, १०, ११ आणि १५ मधील विविध विकासकामांसाठी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष दादा ढेकणे यांनी सातत्याने शासन स्तरावर पाठपुरावा केला. या पाठपुराव्यात भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक अनिकेत पटवर्धन यांनी समन्वय साधत विकासकामांच्या प्रस्तावांना गती दिली. त्यांच्या प्रयत्नांमुळे महायुती सरकारच्या माध्यमातून शहरातील अनेक विकासकामांना मंजुरी मिळाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या सहकार्यामुळे शहर विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला आहे.
दादा ढेकणे तसेच भाजपचे पदाधिकारी यांनी विविध प्रभागांतील नागरिकांच्या मागण्या लक्षात घेऊन शासनाकडे विकासकामांचे प्रस्ताव सादर केले होते. या प्रस्तावांचा सकारात्मक विचार करून सुमारे ४ कोटी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या मंजूर निधीतून होणारी विकासकामे अशी - विविध भागांमध्ये गटारे बांधणे, अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण, उद्यानांचे सुशोभीकरण व विकास, एलईडी दिवे बसविणे, सार्वजनिक ठिकाणी प्रकाशयोजना, पावसाळी पाण्याचा निचरा सुधारण्यासाठी गटार व्यवस्था, नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित विविध कामे.
विशेष म्हणजे शासनाकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावांपैकी अनेक कामांना मंजुरी मिळाली असून संबंधित विभागांकडून प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे. या सर्व विकासकामांमुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सुसूत्रता येणार असून शहराच्या सर्वांगीण विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
याबाबत भाजप शहराध्यक्ष दादा ढेकणे म्हणाले, महायुती सरकारच्या विकासाच्या धोरणांमुळे आणि पक्षनेतृत्वाच्या भक्कम पाठबळामुळे रत्नागिरी शहरातील प्रलंबित असलेली विकासकामे मार्गी लागत आहेत. अनिकेत पटवर्धन यांच्या सातत्यपूर्ण समन्वयामुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री उदय सामंत यांच्या सहकार्यामुळे शहराच्या विकासाला नवी गती मिळाली आहे. आगामी काळातही नागरिकांच्या हितासाठी आणखी विकासकामे मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी