
हिंगोली, 28 जून (हिं.स.)।
राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अभियान संचालक तथा आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर यांनी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा रुग्णालये आणि विविध आरोग्य कार्यक्रमांचा सविस्तर आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना परिणामकारक, गुणवत्तापूर्ण आणि नागरिककेंद्री आरोग्य सेवा देण्यासाठी स्पष्ट दिशा दिली.
जिल्हा परिषद हिंगोली येथील नक्षत्र सभागृहामध्ये जिल्हास्तरीय आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, आरोग्य सेवा ही केवळ उपचारांपुरती मर्यादित न राहता प्रतिबंधात्मक, सर्वसमावेशक आणि नागरिकांच्या अपेक्षांना प्रतिसाद देणारी असावी. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयाने दर्जेदार सेवा, वेळेवर उपचार आणि नागरिकांचे समाधान यांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
आयुक्त काटकर यांनी ओपीडी व आयपीडी सेवा, प्रयोगशाळांची गुणवत्ता, आवश्यक औषधांचा पुरेसा साठा, माता-बाल आरोग्य सेवा, प्रसूती सुविधा, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी तसेच आरोग्य केंद्रांची स्वच्छता आणि गुणवत्ता व्यवस्थापन यावर विशेष भर दिला.
आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम करण्यासाठी Health Management Information System (HMIS) चा प्रभावी वापर, अद्ययावत व अचूक माहिती नोंदविणे, नियमित आढावा घेणे आणि त्याआधारे निर्णय प्रक्रिया राबविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK), लसीकरण, माता-बाल आरोग्य, क्षयरोग नियंत्रण आदी कार्यक्रमांची उद्दिष्टे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
आरोग्य अधिकाऱ्यांनी केवळ कार्यालयीन कामकाजापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष क्षेत्रभेटी, आरोग्य केंद्रांचे नियमित निरीक्षण, कर्मचारी मार्गदर्शन आणि लोकांशी संवाद वाढवावा. आरोग्य सेवेत तंत्रज्ञानाचा वापर, प्रभावी नियोजन आणि आंतरविभागीय समन्वय यामुळेच सेवा अधिक परिणामकारक होईल, असे त्यांनी सांगितले.
दौऱ्यादरम्यान त्यांनी भांडेगाव व गोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट देऊन रुग्णांशी व त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधला. उपलब्ध आरोग्य सेवांबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच शाळकरी विद्यार्थ्यांशी संवाद साधून निरोगी जीवनशैली, वाचनाची सवय आणि आयुष्यात मोठे ध्येय निश्चित करण्याचा प्रेरणादायी संदेश दिला.
नागरिकांना वेळेवर, सुलभ, दर्जेदार आणि तंत्रज्ञानाधारित आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हेच आरोग्य विभागाचे सर्वोच्च ध्येय असून, त्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याने उत्तरदायित्वाने आणि संवेदनशीलतेने काम करावे, असे आवाहन आयुक्त संजय काटकर यांनी यावेळी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis