
रत्नागिरी, 28 जून (हिं.स.) । भारतीय जनसंघाचे संस्थापक प्रखर राष्ट्रवादी विचारवंत व अखंड भारताचे पुरस्कर्ते डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त दि. २३ जून ते ६ जुलै २०२६ या कालावधीत डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्मृती पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. त्याअंतर्गत रत्नागिरी शहर भाजपाच्या वतीने मांडवी समुद्रकिनारा येथे स्वच्छता अभियान उत्साहात पार पडले.
महाराष्ट्र प्रदेश भाजपाच्या सूचनेनुसार आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात रत्नागिरी शहर भाजपाचे शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्या पुढाकाराने स्वच्छ भारत सुंदर भारत या संकल्पनेला बळ देण्यासाठी मांडवी समुद्रकिनारा परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
या अभियानामध्ये मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा व इतर टाकाऊ वस्तू संकलित करून परिसर स्वच्छ करण्यात आला.
या कार्यक्रमाचे संयोजक नीलेश मराठे यांनी उत्कृष्ट नियोजन केले. तसेच सहसंयोजक सारिका शर्मा व संकेत कदम यांनीही या अभियानाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.
या स्वच्छता अभियानात जिल्हा पदाधिकारी नगरसेवक, शहर व मंडळ पदाधिकारी, मोर्चा पदाधिकारी शक्तिकेंद्र प्रमुख, बूथ अध्यक्ष तसेच भारतीय जनता पार्टीचे अनेक कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.
यावेळी शहराध्यक्ष दादा ढेकणे यांनी सांगितले की मांडवी समुद्रकिनारा हे रत्नागिरीचे महत्त्वाचे पर्यटन केंद्र असून त्याचे सौंदर्य आणि स्वच्छता राखणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. पर्यटक आणि स्थानिक नागरिकांनी समुद्रकिनारा परिसरात कचरा टाकू नये. स्वच्छता राखावी आणि पर्यावरण संवर्धनासाठी सहकार्य करावे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी