
अमरावती, 30 जून (हिं.स.) | उन्हाळ्याची मोठी सुट्टी संपल्यानंतर राज्यभरातील शाळा आजपासून पुन्हा सुरु झाल्या आहेत. नवीन इयत्ता, नवे शिक्षक आणि पालकांना सोडून पुन्हा शाळेत जाताना चिमुरडे हमसून हमसून रडत आहेत. तर माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यां आवडीने शाळेत पोहचले त्याच वेळी दीर्घ सुट्टीनंतर जुन्या मित्रांची पुन्हा भेट झाल्यामुळे चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला आहे.
अमरावती जिल्ह्यातील बहुतांश शाळा प्रशासनाकडून गुलाब पुष्प देऊन आणि ढोलताशे वाजवून विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आले मुलांना शाळा ही घरासारखी वाटावी आणि शाळेतला पहिला दिवस त्यांच्या कायमस्वरुपी आठवणीत राहावा, म्हणून अमरावती जिल्ह्यातील वेगवेगळ्या शाळा वेगवेगळ्या पद्धतीने मुलांचे स्वागत करतात.अमरावती जिल्ह्यात तब्ब्ल २८७१ शाळा आहेत व या सर्व शाळेत आजपासून विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरु झाला आहे.
गुलाबपुष्प व भेटवस्तू:
शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन व काही ठिकाणी औक्षण करून स्वागत केले. अनेक शाळांमध्ये मुलांना चॉकलेट्स आणि खाऊचे वाटपही केले जाते. स्वागतासोबतच इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तके व गणवेशाचे वाटप करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी