
लातूर, 21 जुलै (हिं.स.)।
अहमदपूर पंचायत समिती सभापती सूरज पाटील यांनी घेतली सर्कलनिहाय विकासकामांची आढावा बैठक; विकासकामांत हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही – स्पष्ट तंबी
अहमदपूर पंचायत समितीचे सभापती सूरज पाटील यांनी पंचायत समिती सभागृहात तालुक्यातील सर्कलनिहाय विकासकामांची तातडीने आढावा बैठक घेतली. या बैठकीत कृषी संबंधित कर्मचारी, महावितरण आणि पाणी पुरवठा विभागाच्या कामकाजाचा सखोल आढावा घेण्यात आला. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना वेळेत मिळावा, सुरू असलेली विकासकामे दर्जेदार व निश्चित वेळेत पूर्ण व्हावीत आणि नागरिकांचे प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लावले जावेत, असे स्पष्ट निर्देश सभापतींनी यावेळी दिले.
सध्या पावसाने दडी मारल्यामुळे पिके सुकत असल्याची गंभीर दखल घेत सभापती सूरज पाटील यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सुनावले की, थ्री फेजमध्ये विनाकारण विद्युत पुरवठा खंडित होता कामा नये आणि वीजपुरवठा खंडित होण्याच्या कारणांवर तातडीने नियंत्रण मिळवावे. तसेच ग्रामीण भागात जिथे कुठे पाणी समस्येबाबत अडचणी निर्माण होत असतील, तिथे पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ प्रत्यक्ष मोक्यावर जाऊन पाहणी करावी आणि समस्येचे त्वरित निवारण करून नागरिकांना दिलासा द्यावा, असे कठोर आदेश त्यांनी दिले. कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून काम करावे आणि विकासकामांमध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही, अशी सक्त ताकीद त्यांनी यावेळी दिली.
या बैठकीस गटविकास अधिकारी पंकज शेळके यांच्यासह कृषी विभागाचे कर्मचारी, महावितरणचे अधिकारी व कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना सभापती सूरज पाटील म्हणाले की, माजी मंत्री बाळासाहेब जाधव, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, सभापती मंचकराव पाटील आणि जाधव कुटुंबीयांनी आपल्या कर्तृत्वाने अहमदपूर मतदारसंघाचा कायापालट केला आहे. याच विकासाच्या महान धर्तीवर त्यांचा हाच यशस्वी वारसा आपण यापुढेही असाच प्रामाणिकपणे जोपासत राहणार असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis