
काबुल , 21 जुलै (हिं.स.)।अफगाणिस्तानमध्ये सोमवारी अचानक आलेल्या भीषण पुरामुळे किमान २० जणांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक नागरिक बेपत्ता आहेत. अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रवक्ते युसुफ हम्माद यांनी ही माहिती दिली.
हम्माद यांनी सांगितले की, पूर्वेकडील नूरिस्तान प्रांतात आलेल्या पुरानंतर बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी शोध आणि बचाव मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यांनी नागरिकांना आवाहन करत म्हटले की, पूराचा धोका असलेल्या आणि संवेदनशील भागांपासून दूर राहावे. दुर्दैवाने, आज पारुन शहरासह नूरिस्तान प्रांतातील अनेक भागांमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे आपल्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. या पुरामुळे घरे, शेती क्षेत्रे तसेच सार्वजनिक सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचेही त्यांनी सांगितले.
सरकारी प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद म्हणाले की, नूरिस्तान प्रांतातील पुरामुळे झालेल्या जीवित आणि वित्तहानीची माहिती मिळाल्यानंतर आम्हाला अत्यंत दुःख झाले आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती आम्ही संवेदना व्यक्त करतो आणि जखमी नागरिकांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो. दरम्यान, परिवहन आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या हवामान विभागाने देशातील ३४ पैकी १० प्रांतांमध्ये आणखी प्रतिकूल हवामानाची शक्यता वर्तवली आहे. या भागांमध्ये मुसळधार पाऊस, वादळी वारे, धूळ व वाळूच्या झंझावाती वाऱ्यांसह अचानक पूर येण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मंत्रालयाने नागरिकांना नदीकाठच्या भागांपासून तसेच पूरप्रवण क्षेत्रांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. अफगाणिस्तानमध्ये हवामानाशी संबंधित तीव्र घटनांचा धोका कायम असतो. हिमवर्षाव आणि मुसळधार पावसामुळे अचानक पूर (फ्लॅश फ्लड) येण्याच्या घटना वारंवार घडतात. अशा आपत्तींमध्ये अनेकदा एकाच वेळी डझनावारी किंवा शेकडो लोकांचा मृत्यू होतो. २०२४ मध्ये वसंत ऋतूमध्ये आलेल्या अचानक पुरामुळे ३०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. तसेच यावर्षीच्या सुरुवातीला देशातील विविध भागांमध्ये आलेल्या पुर आणि भूस्खलनाच्या घटनांमुळे किमान ११० जणांचा बळी गेला होता.
गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेला संघर्ष, कमकुवत पायाभूत सुविधा, ढासळती अर्थव्यवस्था, मोठ्या प्रमाणावरील वृक्षतोड आणि हवामान बदलाचे वाढते परिणाम यांमुळे अशा नैसर्गिक आपत्तींचा प्रभाव अधिक गंभीर होत आहे. विशेषतः दुर्गम भागांमध्ये अनेक घरे मातीची असल्याने अचानक येणाऱ्या पुरापासून किंवा अतिवृष्टीपासून पुरेसे संरक्षण मिळत नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode