
रत्नागिरी, 25 जुलै (हिं.स.) । येथील बाजारपेठेतील पुरातन श्री विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी मोठ्या भक्तिभावात साजरी करण्यात आली. मंदिरात पहाटेपासूनच भक्तांची गर्दी उसळली होती. यावेळी सर्वप्रथम पूजा करण्याचा मान जितेंद्र जोशी व सौ. राधिका जोशी दाम्पत्याला मिळाला.
मंदिर परिसर आकर्षक रोषणाईने उजळून निघाला होता. भजन-कीर्तनाच्या सुरांनी वातावरण भक्तिमय झाले होते आणि विठ्ठल विठ्ठलच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. भक्तांनी मोठ्या उत्साहात दर्शन घेत, आषाढी एकादशीचा आनंद लुटला.
शिवकालीन गढीमुळे प्रसिद्ध असलेल्या साटवली (ता. लांजा) येथील ऐतिहासिक विठ्ठल मंदिरातही पारंपरिक पद्धतीने आषाढीचा उत्सव उत्साहात साजरा झाला. पावस (ता. रत्नागिरी) येथील स्वामी स्वरूपानंदाच्या समाधी मंदिरातील विठ्ठलरखुमाईची पूजा यथासांग पार पडली.
याशिवाय जिल्ह्यात ठिकठिकाणच्या विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीनिमित्ताने भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी