
पुणे, 26 जुलै (हिं.स.) जुलै महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे राज्यातील धरणांमधील उपयुक्त पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली असून, तो जूनअखेरच्या २२ टक्क्यांवरून थेट ५६ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. राज्यातील धरणांमध्ये सध्या सुमारे ८०३ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र, या वाढीचा लाभ राज्यातील सर्वच भागांना समान प्रमाणात मिळालेला नसल्याने मराठवाडा आणि विदर्भातील जलस्थिती अजूनही चिंतेचा विषय ठरत आहे.
जूनअखेर राज्यातील धरणांमध्ये केवळ ३२४.५४ टीएमसी (२२ टक्के) उपयुक्त पाणीसाठा होता. त्यानंतर जुलैच्या पहिल्या तीन आठवड्यांत झालेल्या मुसळधार पावसामुळे अवघ्या महिनाभरात धरणांमध्ये ४७८ टीएमसीहून अधिक पाण्याची भर पडली. त्यामुळे राज्याच्या एकूण जलसाठ्यात मोठी सुधारणा झाली आहे.
पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक प्रमुख धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. कोयना (६८ टक्के), उजनी (६८ टक्के), भातसा (८७ टक्के), मुळशी (९५ टक्के), डिंभे (८५ टक्के), भंडारदरा (९० टक्के) आणि कन्हेर (९४ टक्के) या धरणांमधील साठा दिलासादायक आहे.
मात्र, छत्रपती संभाजीनगर विभागातील धरणांची स्थिती अद्यापही समाधानकारक नाही. या विभागातील धरणांमध्ये केवळ २८ टक्के उपयुक्त पाणीसाठा असून, राज्यातील महत्त्वाच्या जायकवाडी धरणात फक्त ३९ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. त्यामुळे मराठवाड्यातील पाणीपुरवठा आणि जलव्यवस्थापनाचे आव्हान कायम असल्याचे चित्र आहे.राज्यातील जलसाठ्यात एकूण वाढ झाली असली तरी पावसाचे असमान वितरण लक्षात घेता आगामी काळात पाण्याचे नियोजन आणि प्रभावी जलव्यवस्थापन अधिक महत्त्वाचे ठरणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु