
मुंबई, 15 ऑगस्ट, (हिं.स.)। स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केलेल्या मार्गदर्शनानुसार सन 2047 पर्यंत आपण सर्वांनी 'विकसित भारता'चा संकल्प करू या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरित ऊर्जा आणि नील ऊर्जा या क्षेत्रात देश पुढे घेऊन जाण्यासंदर्भात विशेष मार्गदर्शन केले. गेल्या काही वर्षांत अंतराळ, विज्ञान, संरक्षण अशा वेगवेगळ्या सर्वच क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती करत देश परमवैभवाच्या दिशेने जात असताना त्यात आपल्याला काय योगदान देता येईल, याचा विचार युवावर्गासह प्रत्येकाने केला पाहिजे, असे आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी शनिवारी केले. भाजपा प्रदेश कार्यालयात त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषद सभापती राम शिंदे, प्रदेश सरचिटणीस आ. निरंजन डावखरे, प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये, महिला मोर्चा प्रदेश अध्यक्षा आ. चित्रा वाघ, प्रदेश सरचिटणीस सुनिल राणे, आ. सुनिल कर्जतकर, अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश अध्यक्ष विश्वजित गायकवाड, प्रदेश मुख्यालय प्रभारी रविंद्र अनासपुरे, मुख्यालय सहप्रभारी विश्वास पाठक, नगरसेवक कमलाकर दळवी, रिटा मकवाना, अतुल शाह, मुंबई महिला मोर्चा सरचिटणीस राजवी नाईक, रचना शिरसाट, किरण जैन, वर्षा भोसले, मधु चव्हाण, राजन साळवी, मुकुंद कुलकर्णी आदि मान्यवर उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर