
नंदुरबार, 25 ऑगस्ट (हिं.स.) | नंदुरबारच्या आठवडी बाजाराला सुटे तेल बंदीचा निर्णयामुळे ग्राहकांची गर्दी ओसरली असून, व्यापारी वर्ग चिंतेत सापडला आहे. सुटे तेल बंदीमुळे बाजारातील एकूण उलाढालीवर नकारात्मक परिणाम झाला असून, व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर जवळपास २०% घट झाल्याचे दिसून येत आहे. याचबरोबर, साखरेच्या दरातही वाढ झाल्याने सामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. सुटे तेल उपलब्ध नसल्यामुळे आणि दर वाढल्यामुळे त्यांच्या दैनंदिन खर्चाचे नियोजन बिघडले आहे. हातावर पोट असणाऱ्या आणि मजुरीवर अवलंबून असलेल्या लोकांसाठी ही परिस्थिती अधिक बिकट बनली आहे. त्यांच्या मते, त्यांना पाऊचमधील किंवा पॅकेटमधील तेल घेणे शक्य होत नाही, कारण ते त्यांच्या बजेटमध्ये बसत नाही. सुटे तेल असल्यामुळे त्यांना त्यांच्या गरजेनुसार पावशेर, अर्धा किलो किंवा एक किलो अशा प्रमाणात खरेदी करता येत होते, जे आता पाऊचमुळे शक्य होत नाही. नागरिकांनी तेल आणि साखरेचे दर कमी करण्याची, तसेच सुटे तेल विक्री पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर