
बीड, 28 ऑगस्ट (हिं.स.)। सरकारकडून कर्जमाफीचा गवगवा करून स्वतःची पाठ थोपटली जात आहे. मात्र, कर्ज घेऊन ते थकवलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळत असताना, स्वतःच्या पैशातून शेती करणाऱ्या आणि कर्ज न घेणाऱ्या शेतकऱ्यांचे काय, असा सवाल शेतकरी बांधवांकडून उपस्थित केला जात आहे.
दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कर्ज घेऊन शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या माध्यमातून दिलासा मिळू शकतो; मात्र कर्ज न घेता स्वतःच्या पैशातून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीनंतर कोणता आधार मिळणार, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
“कर्ज घेतले, थकवले आणि कर्जमाफी मिळाली—त्यांची सोय झाली; मात्र ज्यांनी कर्जच घेतले नाही, त्यांनी दुष्काळात पिके वाया गेल्यानंतर जगायचे कसे?” असा सवाल शेतकरी बांधवांकडून केला जात आहे.
सरकारने केवळ कर्जमाफीपुरते मर्यादित न राहता, कर्ज न घेतलेल्या आणि दुष्काळामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी बांधवांकडून करण्यात येत आहे.
------------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis