
नाशिक, ४ ऑगस्ट (हिं.स.) :सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांच्या नावाखाली शहरातील रस्त्यांची झालेली खोदाई आणि जीवघेण्या खड्ड्यांच्या प्रश्नावरून नाशिक शहर काँग्रेसने महापालिका प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. नागरिकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत काँग्रेसने सोमवारी (दि. ३) राजीव गांधी भवन येथे जोरदार आंदोलन केले.
शहराध्यक्ष नीलेश खैरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष शरद आहेर यांची प्रमुख उपस्थिती होती. खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांमध्ये नागरिकांचे बळी जात असतानाही प्रशासन जबाबदारी झटकत असल्याचा आरोप यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला.
खड्ड्यांमुळे झालेल्या मृत्यूंची वास्तविक संख्या लपवली जात असल्याचा दावाही काँग्रेसकडून करण्यात आला. आंदोलनादरम्यान महापालिका प्रशासन आणि संबंधित ठेकेदारांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून शहरातील सर्व खड्डे तातडीने बुजवावेत, अपघातग्रस्त तसेच मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी आणि निष्काळजीपणाला जबाबदार अधिकारी व ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत, अशा मागण्या करण्यात आल्या.
मागण्या मान्य न झाल्यास महापालिका प्रशासनाविरोधातील आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे.
या आंदोलनात उल्हास सातभाई, स्वाती जाधव, उद्धव पवार, ज्ञानेश्वर काळे, जयेश पोकळे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
---------------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV