
अमरावती, 04 ऑगस्ट (हिं.स.)। जिल्हा परिषदेच्या काही विभागांमध्ये हिरकणी कक्ष, विशाखा समिती नसल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. या पार्श्वभूमीवर विविध विभागांतील महिला कर्मचाऱ्यांना सुरक्षित आणि सन्मानजनक कार्यस्थळ उपलब्ध करून देण्यासाठी ‘हिरकणी कक्ष' तसेच समुपदेशन व तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्याची मागणी कर्मचारी संघटनांनी केली आहे. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले आहे.
कर्मचारी संघटनेच्या पाहणीनुसार भातकुली पंचायत समिती, जिल्हा परिषदेचा कृषी विभाग, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग येथे महिला कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक सुविधांनीयुक्त स्वतंत्र ‘हिरकणी कक्ष' नाही. संबंधित कार्यालयांमध्ये विशाखा अंतर्गत तक्रार समिती, अंतर्गत गोपनीय समुपदेशन आणि तक्रार निवारण कक्षही नाही. त्यामुळे तो सुरू करण्यात यावा, असे कर्मचारी संघटनेच्या निवेदनात म्हटले आहे.
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटना आणि कर्मचारी युनियनची संयुक्त सभा नुकतीच पार पडली. या सभेत संबंधित विषयावर चर्चा करून ठराव एकमताने मंजूर करण्यात आला, तसेच महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी दिलेल्या सूचनांच्या अनुषंगानेही ही मागणी करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटना व कर्मचारी युनियनचे जिल्हाध्यक्ष पंकज गुल्हाने व इतर पदाधिकाऱ्यांनी दिले आहे.कार्यस्थळ उपलब्ध करून देण्यासाठी ‘हिरकणी कक्ष' तसेच समुपदेशन व तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्याची मागणी कर्मचारी संघटनांनी केली आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी