
नगर पालिका, व्हीजेएमच्या पदाधिकाऱ्यांनी दिली माहिती
वर्धा, 04 ऑगस्ट (हिं.स.) पाणी प्रत्येकाची गरज आहे. त्यामुळे त्याचा ज्या प्रमाणात वापर होतो त्या प्रमाणात त्याचे पुनर्भरण होत नाही. उन्हाळा येताच पाण्याच्या संचयाचा विषय येतो. परंतु, पावसाळा येताच पुन्हा जलपुनर्भरणाचा विषय मागे पडतो. पावसाचे पाणी पडते आणि ते वाहुन जाते. त्या पाण्यातून जलपुनर्भरण करण्याकरिता नगर परिषद आणि व्हीजेएमच्या वतीने वर्ध्यात स्पंज सिटी उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती नगराध्यक्ष सुधीर पांगूळ आणि व्हीजेएमचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे यांनी दिली.
धावत्या पाण्याला चालवायला शिकविणे, चालत्या पाण्याला थांबिण्याचे शिकविणे आणि थांबलेल्या पाण्याला मुरायला शिकविणे असा या उपक्रमाचा मार्ग असल्याचे यावेळी वैद्यकीय जनजागृती मंचचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे यांनी सांगितले. शहरातील मोकळ्या जागेत, रस्त्याच्या कडेलापालिकेच्या निर्णयानुसार खड्डे करायचे आणि त्यात रस्त्याने वाहत असलेले पाणी साचवायचे आणि मुरवायचे असा सरळ मार्ग शहरातील पाण्याची पातळी वाढविण्याकरिता अवलंबणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. शहरातील रस्ते, नाल्या सिमेंटच्या झाले. रस्त्याच्या कडेला पेव्हींग ब्लॉक लागले. त्यामुळे जमिनीत पाणी मुरत नाही. हे पाणी मुरविण्याकरिता हा उपक्रम राबविण्यात येत आहे. नागरिकांनी त्यांच्या घरी रेन वॉटर हार्वेस्टींग लावूनही पावसाचे पाणी वाचविणे सहज शक्य असल्याचे सागण्यात आले.
ग्रामीण भागातच मुरते पाणी शहरातील रस्ते, नाल्या सिमेंटच्या झाल्या. घरोघरी जमिनीवर सिमेंट काँक्रिट टाकण्यात आले. त्यामुळे पावसाचे पाणी थेट वाहून जाते. उलट ग्रामीण भागात शेतात, ओसाड जमिनीवर पडलेले पाणी वाहून जाण्याऐवजी ते तिथेच मुरते. आज प्रगत देशात पाणी मुरविण्याकरिता अनेक प्रयत्न होत आहेत. आपण मात्र पाणसाचे पाणी सहज वाहू देतो. यातून पुढे मोठा धोका निर्माण होणार असल्याचे ते म्हणाले.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी