
लातूर, 04 ऑगस्ट (हिं.स.)। साहित्य भारती, उदगीर शाखा व ज्येष्ठ नागरिक संघ, उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने व्यासपौर्णिमेनिमित्त आयोजित कविसंमेलन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या कार्यक्रमास साहित्यप्रेमी, कवी-कवयित्री आणि रसिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.
प्रारंभी महर्षी वेदव्यास यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिका मंगला शेटे बिरादार या होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवमुर्ती भातंबरे ,विश्वनाथ बिरादार माळेवाडीकर ज्येष्ठ कवी किशन उगले,अनंतराव कुडलीकर होते. प्रास्ताविक साहित्य भारती उदगीर शाखेच्या अध्यक्षा सुनंदा सरदार यांनी केले.प्रास्ताविकात त्यांनी नवोदित तसेच नामांकित लेखक, कवी आणि साहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी साहित्य भारती, उदगीर शाखा सातत्याने प्रयत्नशील राहील. साहित्य संवर्धनासाठी विविध साहित्यिक उपक्रम, कविसंमेलने, व्याख्याने, काव्यवाचन, पुस्तक प्रकाशन सोहळे तसेच नवोदितांना प्रोत्साहन देणारे विविध कार्यक्रम नियमितपणे आयोजित करण्यात येत असल्याचे सांगितले.
यानंतर झालेल्या कविसंमेलनात अश्विनी निवर्गी, शिवनंदा सोलापूरे, मंगला शेटे बिरादार, प्राचार्या मैनाताई साबणे, रंजनाताई जोशी, आसावरी अपसिंगेकर,कल्पना नळगीरकर, अनुराधा धोंड, प्रेमला नळगीरे यांच्यासह उपस्थित कवी-कवयित्रींनी सामाजिक, शैक्षणिक, भक्तिरस, स्त्रीशक्ती, नाती, आई, प्रेम, कष्ट आणि जीवनमूल्यांवर आधारित दर्जेदार कविता सादर करून उपस्थित रसिकांची दाद मिळवली.
अध्यक्षीय समारोपात मंगला शेटे बिरादार यांनी महर्षी वेदव्यास यांच्या साहित्यसेवेचा गौरवपूर्ण वारसा जपण्याचे आवाहन करत साहित्य हे समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis