
रत्नागिरी, 4 ऑगस्ट (हिं.स.) । कोकणातील निसर्गात नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या पौष्टिक रानभाज्यांचे महत्त्व शहरी भागातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि खेडोपाडी राहणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी रत्नागिरीत १४ ऑगस्ट रोजी रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि प्रकल्प संचालक आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने १४ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता देसाई बँक्वेट हॉल (माळनाका) येथे हा जिल्हास्तरीय महोत्सव व रानभाजी पाककला स्पर्धा पार पडणार आहे.
कोकणामध्ये पावसाळ्यात कोणत्याही लागवडीशिवाय, रासायनिक खतांशिवाय आणि कीटकनाशकांच्या फवारणीशिवाय अनेक औषधी रानभाज्या नैसर्गिकरीत्या उगवतात.
भारंगी, दिंडा, कुर्डू, केनी, कुड्याच्या शेंगा, आघाडा, टाकळा, आंबाडी, पानाचा ओवा, कपाळफोडी यांसारख्या अनेक भाज्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्वे (अ, ब, क, इ), खनिजे, प्रथिने आणि तंतुमय पदार्थ मोठ्या प्रमाणावर असतात.
या भाज्यांचे उष्मांक (कॅलरीज) मूल्य कमी असल्याने त्या मधुमेहींसाठी अत्यंत फायदेशीर ठरतात.
काळाच्या ओघात या भाज्यांचा वापर कमी होत असल्याने त्यांचे मानवी आरोग्यास असणारे फायदे नागरिकांना कळावेत व शेतकऱ्यांना त्यांच्या विक्रीतून थेट आर्थिक फायदा व्हावा, या उद्देशाने ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान तालुका व जिल्हा स्तरावर या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरीतील महोत्सव १४ ऑगस्टला होणार आहे.
महोत्सवाच्या निमित्ताने नागरिकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा तपशील असा : १. रानभाजी रील (Reels) स्पर्धा: उद्देश: रानभाज्यांचे आहारातील महत्त्व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे.
नोंदणी कालावधी: ५ ऑगस्ट ते १२ ऑगस्ट २०२६.
पारितोषिक वितरण: १४ ऑगस्ट रोजी महोत्सवादरम्यान विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात येईल.
अधिक माहितीसाठी संपर्क: वैभव आमरे (९०२१२२०७३४) आणि अमोल सपकाळ (९०२८७९०७४१).
२. रानभाजी पाककला स्पर्धा: स्पर्धेची वेळ: १४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी १२
या स्पर्धेत उत्कृष्ट पाककला कृतींचे नमुने सादर करणाऱ्या स्पर्धकांची निवड करून त्यांना बक्षिसे दिली जातील.
अधिक माहितीसाठी संपर्क : हर्षला गजानन पाटील (९४२२४४१५७१) आणि नेहा पवार (९४२३२०३६४१).
या जिल्हास्तरीय महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि इतर मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. तसेच तालुकास्तरीय कार्यक्रमांना स्थानिक आमदार व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या महोत्सवाला आवर्जून भेट द्यावी तसेच रील आणि पाककला स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन 'आत्मा' प्रकल्प संचालक विजय बेतिवार यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी