
पुणे, 04 ऑगस्ट (हिं.स.)पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील रिक्षा प्रवाशांना आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (आरटीओ) रिक्षा भाडेवाढीस मंजुरी दिल्याने १ सप्टेंबरपासून नवीन दर लागू होणार आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नव्या दरानुसार, पहिल्या १.५ किलोमीटरसाठीचे किमान भाडे २५ रुपयांवरून ३० रुपये करण्यात आले आहे. म्हणजेच प्रारंभिक भाड्यात ५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
तसेच, त्यानंतरच्या प्रत्येक किलोमीटरसाठी आकारले जाणारे भाडे १७ रुपयांवरून २० रुपये प्रति किलोमीटर करण्यात आले आहे. या वाढीमुळे दररोज रिक्षाने प्रवास करणाऱ्या नोकरदार, विद्यार्थी आणि इतर प्रवाशांच्या प्रवास खर्चात वाढ होणार आहे. इंधन, देखभाल आणि वाहन संचालनाचा वाढलेला खर्च लक्षात घेऊन भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या निर्णयामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील दैनंदिन प्रवाशांच्या खिशावर अतिरिक्त आर्थिक ताण पडणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु