
रायगड, 05 ऑगस्ट (हिं.स.)। : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision - SIR) कार्यक्रमाच्या वेळापत्रकात सुधारणा केली आहे. या संदर्भातील आदेश आयोगाने ४ ऑगस्ट २०२६ रोजी जारी केला असून, १ ऑक्टोबर २०२६ ही पात्रता तारीख ग्राह्य धरून सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार ३० जून ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) मार्फत घरोघरी भेटी देऊन मतदार पडताळणी केली जाणार आहे. त्यानंतर १७ ऑगस्ट रोजी मतदान केंद्रांचे पुनर्वचनेकरण किंवा पुनर्व्यवस्थापन करण्यात येईल.
आयोगाच्या निर्देशानुसार २४ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर या कालावधीत मतदारांना नाव समाविष्ट करणे, दुरुस्ती करणे अथवा हरकती नोंदविण्याची संधी उपलब्ध असेल. प्राप्त दावे व हरकतींची सुनावणी करून त्यावरील निर्णय २४ ऑगस्ट ते २२ ऑक्टोबर या कालावधीत घेतले जाणार आहेत.
सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर २७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.भारत निवडणूक आयोगाचे अवर सचिव संदीप कुमार यांनी महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी यांना याबाबत पत्र पाठविले असून, सुधारित वेळापत्रकाची माहिती सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या सुधारित कार्यक्रमाची व्यापक प्रसिद्धी करण्याच्या सूचनाही आयोगाने दिल्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)