
रत्नागिरी, 5 ऑगस्ट (हिं.स.) । भारतीय टपाल विभागातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही राष्ट्रीय स्तरावरील 'ढाई आखर' पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी A Letter to Mother Earth: My Promise to Protect Nature (पृथ्वीमातेला एक पत्र: निसर्गाचे रक्षण करण्याचे माझे वचन) या मध्यवर्ती संकल्पनेवर ही स्पर्धा होणार असून, जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी आणि नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन डाकघर अधीक्षक अ. द. सरंगले यांनी केले आहे.
सध्याच्या वाढत्या डिजिटल युगात पत्रलेखनाची कला काहीशी मागे पडली असली, तरी पत्रांचे भावनिक महत्त्व आजही अबाधित आहे. नागरिकांना आपले विचार, कल्पना आणि लेखन कौशल्य व्यक्त करण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने टपाल विभागातर्फे २०१७ पासून ही स्पर्धा आयोजित केली जात आहे. यंदा ही स्पर्धा १ ऑगस्ट ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत पार पडणार आहे.
स्पर्धेचा विषय A Letter to Mother Earth: My Promise to Protect Nature (पृथ्वीमातेला एक पत्र: निसर्गाचे रक्षण करण्याचे माझे वचन) असा असून स्पर्धकाने स्वहस्ताक्षरात पत्र लिहायचे आहे. कोणताही भारतीय नागरिक या स्पर्धेत भाग घेऊ शकतो. पत्र मराठी, हिंदी, इंग्रजी किंवा कोणत्याही स्थानिक भाषेत लिहिता येईल.स्पर्धेसाठी अंतर्देशीय पत्र (Inland Letter) किंवा पोस्टाचा साधा लखोटा (Envelope) वापरणे बंधनकारक आहे.
अंतर्देशीय पत्रासाठी शब्दमर्यादा ५०० शब्द आहे, तर ए-४ (A4) साइज कागदासाठी (लखोट्यातून पाठवण्यासाठी) शब्दमर्यादा १००० आहे.
स्पर्धा दोन गटांत होणार आहे. १) १८ वर्षांपर्यंत (अंतर्देशीय पत्र आणि लखोटा प्रकार), २) १८ वर्षांवरील (अंतर्देशीय पत्र आणि लखोटा प्रकार) पत्रावर स्पर्धकाने खालीलप्रमाणे वयाचा दाखला स्वहस्ताक्षरात लिहिणे अनिवार्य आहे:
मी असा दाखला देतो / देते की, दि. ०१ जानेवारी २०२६ रोजी मी १८ वर्षांवरील / वर्षांखालील गटात समाविष्ट होते / होतो (I certify that, I am below/above the age of 18 as on 01 January 2026)
स्पर्धेतील विजेत्यांना सर्कल (राज्य) आणि राष्ट्रीय स्तरावर भरघोस रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. ती अशी राज्य स्तर : प्रथम ₹ २५,०००/-, द्वितीय ₹ १०,०००/-, तृतीय ₹ ५,०००/- (प्रत्येक गटात).
सर्कल स्तरावरील उत्कृष्ट ३ पत्रे राष्ट्रीय स्तरावर पाठविली जातील. तेथील विजेत्यांना अनुक्रमे ₹५०,०००/-, ₹२५,०००/- आणि ₹१०,०००/- बक्षिसे दिली जातील.
पत्र पाठविण्याची मुदत व पत्ता असा : स्पर्धकांनी आपले पत्र स्वहस्ताक्षरात लिहून ते जवळच्या पोस्ट ऑफिसमधून ३१ ऑक्टोबर २०२६ पूर्वी मुख्य पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल ऑफिस, मुंबई - ४००००१ या पत्त्यावर पाठवावे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी