
पुणे, 05 ऑगस्ट (हिं.स.)।
पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर ही चारही धरणे शंभर टक्के भरल्याने पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या सातत्यपूर्ण पावसामुळे जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. यंदा धरणांतील पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे १२ टक्क्यांनी अधिक असल्याची नोंद झाली आहे.
सध्या खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात नियंत्रित पाण्याचा विसर्ग सुरू असून, नदीकाठच्या नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा भागात जोरदार पाऊस सुरू असून हवामान विभागाने आज पुणे आणि रायगड जिल्ह्यांच्या घाटमाथा परिसरासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
याशिवाय रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथा भागांसाठी यलो अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. तसेच पूर्व विदर्भातील गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने त्या जिल्ह्यांसाठीही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु