जुने पाण्याचे स्रोत पुनर्जीवित करून टंचाई आराखड्यात समावेश करा - मंत्री तटकरे
मुंबई, 05 ऑगस्ट (हिं.स.) : श्रीवर्धन तालुक्यातील प्रत्येक गावासाठी स्वतंत्र सूक्ष्म नियोजन करावे. तसेच संबंधित गावातील पाण्याचा स्रोत, नाले, बंधारे, साठवण तलाव आणि इतर जलस्रोतांचा अभ्यास करून भविष्यात पाणीटंचाई निर्माण होणार नाही, यासाठी नियोजन करण
जुने पाण्याचे स्रोत पुनर्जीवित करून टंचाई आराखड्यात समावेश करा - मंत्री तटकरे


मुंबई, 05 ऑगस्ट (हिं.स.) : श्रीवर्धन तालुक्यातील प्रत्येक गावासाठी स्वतंत्र सूक्ष्म नियोजन करावे. तसेच संबंधित गावातील पाण्याचा स्रोत, नाले, बंधारे, साठवण तलाव आणि इतर जलस्रोतांचा अभ्यास करून भविष्यात पाणीटंचाई निर्माण होणार नाही, यासाठी नियोजन करण्याच्या सूचना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिल्या.

श्रीवर्धन तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी रायगड जिल्हाअधिकारी किशन जावळे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. उपविभागीय दंडाधिकारी, तहसीलदार, प्रांत अधिकारी, कार्यकारी अभियंता यावेळी उपस्थित होते. यावेळी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असलेल्या गावांचा, जलजीवन मिशनच्या कामांच्या प्रगतीचा तसेच भविष्यातील दीर्घकालीन उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, रायगड जिल्ह्यातील गावांना भविष्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी उपलब्ध जलस्रोत निश्चित करणे, बंधारे व साठवण तलावांची दुरुस्ती, गाळ काढणे, जलस्रोतांचे पुनरुज्जीवन आदी कामे हाती घ्यावीत, जेणेकरून पावसाच्या पाण्याची योग्य साठवण होईल. जलजीवन मिशन योजनांच्या परिसरातील टंचाईग्रस्त गावांची निश्चिती करून पाणीटंचाईची कारणे, उपलब्ध साधनसामग्री, आवश्यक उपाययोजना आणि त्यासंदर्भातील सर्व माहिती संकलित करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

कृषी विभाग, वन विभाग आणि जलसंवर्धन विभाग यांच्या समन्वयातून ही कामे हाती घेण्यासाठी आवश्यक प्रस्ताव तातडीने सादर करावेत. श्रीवर्धन तालुक्यात सध्या २८ गावे आणि ३६ वाड्या पाणीटंचाईच्या समस्येने प्रभावित असून, प्रत्येक गावासाठी स्वतंत्र सूक्ष्म नियोजन करून दीर्घकालीन उपाययोजना राबविण्याचे निर्देश मंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी दिले.

टँकर सुरू असलेल्या प्रत्येक गावाची स्वतंत्र माहिती तयार करून त्या गावांमधील जलजीवन मिशन योजनांच्या प्रगतीचा यावेळी आढावा घेण्यात आला. शासनाच्या नव्या निर्देशानुसार २५ टक्क्यांपेक्षा कमी प्रगती झालेल्या जलजीवन मिशन योजनांना प्राधान्य देऊन त्यांचे नियोजन करावे, तसेच आवश्यक त्या ठिकाणी तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande