
अमरावती, 16 सप्टेंबर (हिं.स.)। जिल्ह्यात १४ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सव आणि २१ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या विसर्जन मिरवणुकांच्या काळात जिल्ह्यातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अमरावती ग्रामीण पोलिसांनी विशेष दक्षता घेतली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३६ अन्वये विशेष आदेश जारी केले आहेत. हे आदेश ३० सप्टेंबरपर्यंत अमरावती ग्रामीण पोलीस क्षेत्रासाठी लागू राहतील.
यात मिरवणुकीचे मार्ग, वेळा आणि शिस्त निश्चित करण्याचे अधिकार पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश आहेत. रस्त्यांवर किंवा सार्वजनिक ठिकाणी ढोल-ताशे, इतर वाद्ये बाजविणे आणि कर्कश लाउड स्पीकरच्या वापरावर पोलीस अधिकाऱ्यांचे पूर्ण नियंत्रण असेल. परवानगीशिवाय जाहीर सभा, मोर्चे, मिरवणुका किंवा पदयात्रा आयोजित करता येणार नाहीत. तसेच शांतता भंग होईल, अशा प्रक्षोभक घोषणा देण्यावर पूर्ण बंदी आहे. हे आदेश लग्नसमारंभ आणि अंत्ययात्रांना लागू नसतील. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम १३४ नुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, जाई असे पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी कळविले आहे.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी