मुंबई, 27 एप्रिल (हिं.स.) : लोकसभा निवडणुकीत दुसऱ्या टप्प्यातील मतदानात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या झंझावातात विरोधक पुरते गलीतगात्र झाल्याचे प्रतिपादन भाजपचे महाराष्ट्र प्रभारी आणि उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री डॉ. दिनेश शर्मा यांनी केले. राज्यातील ठाणे, कल्याण आणि उल्हासनगरच्या पादाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
याप्रसंगी शर्मा म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या दुस-या टप्प्यात मोदी वादळासमोर विरोधक उडून गेले आहेत. राज्यातील पहिल्या दोन टप्प्यांमधील सर्व 13 जागा महायुती जिंकणार आहे. मालमत्ता कराच्या सदर्बातील काँग्रेसची योजना देशवासियांना पचलेली नाही. सॅम पित्रोदा यांनी उघड केलेले मनसुबे ऐकून देश थक्क झालाय. लूटमार हा काँग्रेसच्या संस्कृतीचा भाग असल्याचे सांगून ते म्हणाले की, काँग्रेसवाले ज्यावेळी सत्तेत होते त्यांनी देशाची लूट केली आणि आता सत्तेत येण्यापूर्वीच देशातील जनतेच्या मालमत्तेची लूट करण्याचा त्यांचा घातक हेतू उघड होत आहे. कोणाचीही मालमत्ता बळकावण्याची आणि विशिष्ट वर्गांमध्ये वाटण्याची योजना राज्यघटनेच्या भावनेच्या विरुद्ध आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे उद्धवची सेना आणि पवारांच्या राष्ट्रवादीने काँग्रेसच्या सार्वजनिक मालमत्तेची लूट करण्याच्या योजनेवर गूढ मौन बाळगले आहे.
सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरेंनी रामविरोधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाशी मैत्री करून हिंदूंचा विश्वासघात केल्याचे शर्मा म्हणाले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा जपण्याचा दावा करणाऱ्या उद्धवच्या राजवटीत महाराष्ट्रात हिंदूंचा छळ झाला. आज ते रामविरोधी काँग्रेसशी सलगी करीत आहेत. सत्तेच्या लालसेपोटी त्यांनी बाळासाहेबांच्या धोरणांचा आणि तत्वांचा त्याग केला आहे आणि ते आपल्या मुलाचे राजकीय भविष्य वाचवण्यात व्यस्त आहेत.
काँग्रेसवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, राहुल यांची काँग्रेस राज्यघटनेची पायमल्ली करत आहे. बाबासाहेबांनी राज्यघटनेत मागासवर्गीय आणि दलितांसाठी आरक्षणाची तरतूद केली होती, परंतु आज काँग्रेसचे कर्नाटक सरकार त्यांचे काही हक्क हिसकावून मुस्लिमांना धार्मिक आधारावर देत आहे. हा विचारच घातक आहे. काँग्रेस केवळ घटनाविरोधी आणि लोकांमध्ये फूट पाडणाऱ्या गोष्टींवर बोलत असते. भाजप कोणत्याही आधारावर भेदभाव करत नाही. मोदी सरकारच्या दहा वर्षात केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ देशातील प्रत्येक गरीबाला कोणताही भेदभाव न करता दिला आहे. लोकांमध्ये फूट पाडणे हे विरोधकांचे काम आहे. ते लोकांमधील बंधुभाव पचवू शकत नाहीत. ही महाविकास आघाडी नसून महाबिगडी आघाडी आहे ज्याने सत्तेत असताना राज्यातील विकासकामे रोखून धरली होती. आता डबल इंजिन सरकारने विकासाला नवी दिशा आणि गती दिल्याचे शर्मा यांनी सांगितले.
हिंदुस्थान समाचार