रत्नागिरी : प्रकल्पाविना बेरोजगारी कशी दूर होणार - प्रमोद जठार
रत्नागिरी, 27 एप्रिल, (हिं. स.) : महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने जाहीरनाम्यामध्ये ३०
रत्नागिरी : प्रकल्पाविना बेरोजगारी कशी दूर होणार - प्रमोद जठार


रत्नागिरी, 27 एप्रिल, (हिं. स.) : महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने जाहीरनाम्यामध्ये ३० लाख लोकांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र कोकण विकासाला चालना देताना येथे रोजगार निर्मिती करणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाला महाविकास आघाडीचेच उमेदवार विनायक राऊत विरोध करीत आहेत. असे झाले तर बेरोजगारी कशी दूर होणार आणि कोकणचा विकास कसा होईल, असा प्रश्न भाजपचे लोकसभा प्रभारी प्रमोद जठार यांनी पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित केला.

भाजपच्या राजापूर तालुका संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे (शिंदे गट) शहराध्यक्ष सौरभ खडपे, राजन बेतकर, भाजपचे नेते स्वप्नील गोठणकर, भाजपच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा शीतल पटेल, महिला तालुकाध्यक्ष सुयोगा जठार, श्रुती ताम्हणकर, आदी उपस्थित होते.यावेळी जठार म्हणाले, महाविकास आघाडीचे उमेदवार राऊत यांनी राहुल गांधी हेच पंतप्रधानपदाचे उमेदवार असल्याचे सांगितले, तर संजय राऊत हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पंतप्रधानाचे उमेदवार असल्याचे सांगतात. महाविकास आघाडीत पंतप्रधानपदाच्या उमेदवारावरूनच संभ्रम आहे. महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी कोकणच्या विकासाला नेहमीच प्राधान्य दिले. ते निवडून आल्यास पुन्हा एकदा त्यांच्या माध्यमातून केंद्रात मंत्री म्हणून कोकणचे प्रतिनिधित्व मिळणार आहे. त्यातून निश्चितच कोकणच्या विकासाला चालना मिळेल.

कोकणात सहा लोकसभा मतदारसंघ असून, त्या मतदारसंघांतील जागावाटप करताना सर्व मित्रपक्षांना समान न्याय देण्यात आल्याचे श्री. जठार यांनी सांगितले. त्यात ठाणे, कल्याण आणि रायगडमधील मावळ लोकसभा मतदारसंघ शिवसेना (शिंदे गट), रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि पालघर मतदारसंघ भाजप आणि रायगड मतदारसंघ राष्ट्रवादीला देण्यात आला. जागावाटप करताना महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. कोकणातून धनुष्यबाण गायब केल्याच्या विरोधकांकडून केल्या जात असलेल्या अपप्रचाराला मतदारांनी बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande