* अन्यायाचा प्रतिकार करण्यास बौध्द आणि मातंग समाज अग्रेसर
मुंबई, १ ऑगस्ट (हिं.स.) : साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात योगदान अभूतपूर्व आणि क्रांतीकारी आहे .त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी मरणोत्तर भारतरत्न किताब दिला जावा यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. याबाबत राज्यसरकारने केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली पाहिजे, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतनिमित्त पुण्यात सारसबाग समोरील त्यांच्या पुतळ्याला आठवले यांनी भव्य पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
सामाजिक संगीत आणि क्रीडा क्षेत्रात अनेक मान्यवरांना भारतरत्न किताब मिळाला आहे. त्यामुळे क्रांतीकारी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न किताब मिळालाच पाहिजे त्यासाठी देण्याबाबत आपण केंद्र सरकार कडे प्रयत्न करीत असल्याची माहिती आठवले यांनी दिली.
त्यानंतर येथे जाहीर अभिवादन सभेचे आयोजन मातंग समाज समन्वय समिती तर्फे करण्यात आले होते यावेळी रिपाइं चे दिवंगत ज्येष्ठ नेते कालकथित हनुमंत साठे स्मृतिप्रीत्यर्थ सामजिक कार्यकर्ता पुरस्कार रामदास आठवले यांच्या हस्ते रिपाइं चे राज्य सचिव बाळासाहेब जानराव यांना प्रदान करण्यात आला.
अन्याय सहन करण्याचा काळ आता गेला आहे आता अन्यायाचा प्रतिकार करण्याचा काळ सुरू झाला आहे.अन्यायाचा प्रतिकार करण्यास नवबौध्द आणि मातंग समाज आघडीवर अग्रेसर आहे .मातंग समाज आणि बौध्द समाजात राजकीय सामजिक जागृती मोठ्या प्रमाणावर असून लढणारा झुंजार समाज म्हणून बौध्द आणि मातंग समाज मोठी ताकद आहे.लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना खरे अभिवादन करायचे असेल तर बौध्द आणि मातंग समाजाने एकजूट व्हावे असे आवाहन आठवलेंनी केले.
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी