अमरावती, 15 ऑक्टोबर (हिं.स.)। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) नांदगाव खंडेश्वर शाखेने शहरात बस डेपो उभारण्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. नांदगाव खंडेश्वर हे नगरपंचायतीचे शहर तसेच तालुक्याचे मुख्यालय असूनही येथे अद्याप बसस्थानक उभारण्यात आलेले नाही. त्यामुळे बस थांबण्यासाठी कोणतीही नियोजित जागा उपलब्ध नाही.बसस्थानक नसल्यामुळे विद्यार्थी, नागरिक आणि प्रवाशांना दररोज मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. बस निश्चित ठिकाणी थांबत नसल्याने प्रवाशांना धावपळ करावी लागते. पावसाळ्यात भिजत उभे राहावे लागते, तर उन्हाळ्यात तीव्र उन्हाचा त्रास सहन करावा लागतो.
विद्यार्थ्यांना बसमध्ये चढ-उतार करताना रस्त्यावरच थांबावे लागते, ज्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. नांदगाव खंडेश्वर तालुका शैक्षणिकदृष्ट्या विकसित होत असल्याने येथे दररोज मोठ्या संख्येने विद्यार्थी प्रवास करतात. बस डेपो उभारल्यास विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. निवेदन सादर करतेवेळी नगरमंत्री ओम मोरे, अभिषेक पवार, सुमित नागपुरे, आनंद जयस्वाल, साहिल जांभुळकर, आदित्य गवळी, अभय राजूरकर आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी