अकोला, 16 ऑक्टोबर (हिं.स.)।
राज्य सरकारने नुकतीच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटी रुपयांच्या मदत पॅकेजची घोषणा केली असली, तरी ही मदत शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखी असल्याची तीव्र प्रतिक्रिया शेतकरी संघटना (शरद जोशी स्थापित) यांनी व्यक्त केली आहे.सरकारचं हे पाऊल ऐतिहासिक नसून शेतकऱ्यांमध्ये चीड निर्माण करणारे कृत्य असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. मागील अतिवृष्टीच्या काळात दिलेल्या मदतीपेक्षा यावेळची मदत अधिक तोकडी असल्याचं त्यांनी नमूद केलं.शेतकऱ्यांना प्रती हेक्टर दीड लाख रुपयांची मदत दिवाळीपूर्वी थेट खात्यात जमा करावी, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे.या पार्श्वभूमीवर आज अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी राज्य सरकारच्या निर्णयाचा निषेध करत “जीआरची होळी” केली. या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.शेतकऱ्यांच्या झालेल्या मोठ्या नुकसानीचा विचार करता सरकारने तातडीने योग्य दराने मदत जाहीर करून ती प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अन्यथा पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही यावेळी संघटनेने दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे