
जळगाव, 29 ऑक्टोबर, (हिं.स.)- पारोळा तालुक्यातील टिटवी तांडा येथील एका शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, पारोळा तालुक्यातील टिटवी तांडा येथील युवराज नारायण पवार (वय ५५) असे गळफास घेतलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. शेतकरी युवराज पवार यांनी टिटवी तांडा येथे शिवारात निंबाच्या झाडाला गळफास घेतला.
घटनेची माहिती कळताच नातेवाईक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना उपचारासाठी पारोळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. याबाबत दीपक पवार यांनी पारोळा पोलिस ठाण्यात माहिती दिली.त्यावरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. युवराज पवार हे शेती करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते.त्यांनी शेतीसाठी कर्ज घेतले होते.मात्र सततच्या नापिकी व अवकाळी पावसामुळे शेतातील उत्पन्न आले नाही.त्या नैराश्यात विवंचनेत अखेर कर्जाला कंटाळून त्यांनी गळफास घेत आपले जीवन संपवले.
याबाबत अधिक तपास पारोळा पोलिस करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर